नवी दिल्ली – देशात ऑक्सिजन अभावी एकही रूग्ण दगावल्याची माहिती राज्य सरकारांकडून आलेली नाही असे उत्तर काल राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहे. सरकारच्या या उत्तरावर विरोधक मात्र चांगलेच भडकले आहेत. कॉंग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांनी या प्रकरणात डॉ. भारती पवार यांच्यावर खोटी माहिती दिल्याचा हक्कभंग प्रस्ताव मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून पुन्हा सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, केवळ ऑक्सिजनचीच कमतरता नव्हती तर संवेदनशीलता आणि सत्याची प्रचंड कमतरता होती. ही कमतरता तेव्हाही होती आणि आताही आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही सरकारला या विषयावरून चांगलेच फटकारले आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की सरकारचे हे उत्तर ऐकून आमची बोलतीच बंद झाली आहे. ज्या रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले आहेत त्यांनी सरकारला या खोट्या उत्तराबद्दल कोर्टात खेचले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
जर ऑक्सिजनची कमतरता नव्हती तर रूग्णांचे नातेवाईक देशभर ऑक्सिजन सिलींडर घेऊन इकडे तिकडे का फिरत होते असा सवाल त्यांनी केला आहे. सरकारचे हे उत्तर ऐकून आम्हाला धक्का बसला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. कदाचित हा पेगॅससचा परिणाम असेल अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.
देशात प्रत्येक राज्यामध्ये ऑक्सिजन अभावी करोना रूग्णांचे मृत्यू नोंदवले गेले असताना सरकार असे उत्तर कसे देऊ शकते असा प्रश्नही विरोधकांनी केला आहे. त्यावर सरकारतर्फे अशी सारवासारव करण्यात आली आहे की, राज्यांनी जी आकडेवारी केंद्राकडे पाठवली आहे.
ती आकडेवारीच केंद्रातर्फे जाहीर केली जाते. राज्यांनी त्यांच्या आकडेवारीत ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची माहितीच सादर केलेली नाही असा पवित्रा आता केंद्राकडून घेण्यात आला आहे.