नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवड्यामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली.
याच मुद्यावरून काँग्रेस खासदार ‘के सी वेणुगोपाल’ यांनी मंगळवारी राज्यसभेत प्रश्न विचारला की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव गेलाय का ? त्या प्रश्नाला उत्तर देताना नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, “आरोग्य राज्यांचा विषय आहे. मृतांचा अहवाल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आरोग्य मंत्रालयाला देत असतात. राज्य-केंद्रशासित प्रदेशांच्या रिपोर्टनुसार, देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला.
याच केंद्र सरकारच्या दाव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे.’ असा टोलाही त्यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
ते पुढे म्हणाले,’दुसऱ्या लाटेत अनेक कोविड रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले. अनेक नातेवाईक त्यांच्या पेशन्टला वाचविण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन धावत होते, ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे.’