नवी दिल्ली – देशभरात पेट्रोलियम उत्पादने आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज आज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले.
कॉंग्रेस, शिवसेना आणि तृणमूल कॉंग्रेससह एकत्रित विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना भाववाढीवर सभागृहात चर्चा करण्याची विनंती केली, पण नायडू यांनी ही सुचना फेटाळली. त्यानंतर विरोधी सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली.
या गोंधळात सभापतींनी शून्य तास चालविण्याचा प्रयत्न केला मात्र खासदारांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने त्यांना सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले.गेल्या महिन्यातही,राज्यसभेला अशाच विरोधाचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
वाढत्या महागाईच्या संबंधात विरोधकांकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे पण सरकारने अजून चर्चेची तयारी दर्शवलेली नाही. चालू संसद अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे.