मुंबई – कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावी एकही रूग्ण दगावलेला नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने देशात ऑक्सिजनच्या अभावी एकही रूग्ण दगावलेला नाही असा दावा केला आहे.
त्यावर टोपे यांची प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले की असा प्रकार महाराष्ट्रात तरी घडलेला नाहीं. केंद्र सरकारने जो दावा केला आहे त्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्याचा प्रतिवाद करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी असे म्हटले होते की राज्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्या आधारेच केंद्राने हे उत्तर दिले आहे.
ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रूग्णांची स्वतंत्र माहिती राज्यांनी पाठवलेली नाही असेही पात्रा यांनी नमूद केले. महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टातही आमच्या राज्यात ऑक्सिजन अभावी एकही रूग्ण दगावलेला नाही असे प्रतिज्ञापत्र दिले आहे असा दाखलाही संबित पात्रा यांनी दिला होता. तसाच दावा छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी.एस. सिंगदेव यांनीही केला आहे.