पुणे शहराचा महापौर म्हणून काम करत असताना, शहरातील अनेक पायाभूत सुविधांच्या उभारणीचा अनुभव मला आला. या वेळी शहरातील सर्वांत रहदारीचा भाग असणाऱ्या स्वारगेट भागात उभारलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करायचे होते. हा पूल बांधावा, असा विचार ज्यांचा होता, त्या आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्तेच पुलाचे उद्घाटन व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे, मी त्यांना फोन केला आणि दुपारी बारा किंवा सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम घेता येईल का, अशी विचारणा केली. त्यावर प्रशांत, उद्घाटनाचा कार्यक्रम करताना मला पुणेकरांची गैरसोय करायची नाही. तुम्ही थेट उड्डाणपूल सुरू का करून देत नाही? उद्घाटनच करायचं असेल, तर सकाळी साडेसहा ही वेळ चालेल का? मी येईन आणि फित कापेन, झाले उद्घाटन.. सभा वगैरे काही नको… असे थेट सांगत मोठा कार्यक्रम घ्यायचा नाही, अशी तंबीच अजितदादांनी मला दिली होती.
उद्घाटनाचा कार्यक्रम ठरला आणि वेळही सकाळी साडेसहाची होती. मी वेळेत तयार होत होतो आणि काही कारणाने माझ्या ड्रायव्हरला थोडा उशीर झाला. तरीही वेळेत पोहोचण्याच्या हिशेबाने मी घरातून बाहेर पडलो होतो. तेवढ्यात मला अजितदादांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांचा फोन आला. कधी पोहोचणार आहात, दादा पोहोचले, एवढेच ते बोलले. मी घड्याळात पाहिले, तर सव्वासहाच होत होते. पुढच्या पाच मिनिटांत मी पोहोचलो, तर या महापौर, तुमचे स्वागत आहे.. तुम्ही आम्हाला बोलवा उद्घाटनाला आणि तुम्हीच उशिरा या, असे म्हणत अजितदादाच माझ्या स्वागताला पुढे आले. पण, अजितदादांच्या वक्तशीरपणाविषयी अनेक वर्षांपासून ऐकत आलो होतो, पाहात आलो होतो आणि त्याचा प्रत्यक्ष असा अनुभव येईल, असे वाटले नव्हते.
सार्वजनिक जीवनामध्ये राहात असताना, सर्व माणसांना सांभाळून घेत असताना, वेळेच गणित चुकण्याची शक्यता असते. या परिस्थितीमध्येही अजितदादांनी कायम एक गोष्ट जपली ती म्हणजे वेळ. अगदी पहाटे साडेचार वाजता उठून, साडेसहा वाजता पहिल्या भेटीला सुरुवात करणारा हा नेता आहे. रात्री कितीही उशीर झाला, तरीही त्यांचा हा दिनक्रम चुकत नाही, हे विशेष. स्वतःच्या वेळेबरोबरच अन्य व्यक्तींच्या गरजेचीही ते आवर्जून काळजी घेतात, हेही आवर्जून नमूद करावे लागेल. पक्षात अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काम करत असताना, मला नंतर पीएमपीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी पीएमपीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित होते. त्याविषयी अधिकाऱ्यांनीच मला सांगितले आणि ते विषय मार्गी लावण्यासाठी अजितदादांकडे गळ घालण्याची विनंती केली. त्यावर चर्चा झाली आणि एकेदिवशी अजितदादांना भेटायला मंत्रालयात गेलो. आम्ही पुण्याहून या कामासाठी आलेलो असल्यामुळे, अजितदादांनी यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. विशेषतः अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा प्रश्न त्यामध्ये होता. पीएमपी मधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी किंवा मुलांच्या नियुक्तीचा प्रश्न का रखडला होता, याचे कारण कळत नव्हते. या लोकांना नोकरीची आशा होती, पण वेळ जात होता. वेळेवर एखादी गोष्ट मिळाली नाही, तर त्याचा उपयोग काय, याचा विचार करत अजितदादांनी एका झटक्यात निर्णय दिला. त्यामुळे, मंत्रालयात एकाच दिवसात आमचे काम झाले. मंत्रालयासारख्या ठिकाणी एका दिवसातही काम होऊ शकते, याचा अनुभव मला सुरुवातीच्या काळातच आला.
राजकारणामध्ये नव्याने आलेल्याही अनेक नेत्यांना अजितदादांवर टीका केल्याशिवाय चैन पडत नाही, असा हा काळ आहे. पण, या नव्या लोकांची साखरझोप पूर्ण होईपर्यंत अजितदादांनी त्यांच्या दिवसभरातील निम्म्या कामांचा निपटारा केलेला असतो, ही गोष्ट कशी कळणार? त्यामुळेच, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात पुणे महानगरपालिकेची सत्ता होती, त्या काळात पुणे शहरामध्ये झालेला विकास आणि त्यानंतरच्या काळात वेळकाढूपणामध्ये रखडत गेलेली कामे यांची तुलना सहज होऊ शकते.
करोना साथरोगाच्या काळातही अजितदादांच्या वक्तशीरपणाचा अनुभव सर्वांना आला. उपमुख्यमंत्रिपद, अर्थ खात्यासारखी महत्त्वाची जबाबदारी आणि पुण्याचे पालकमंत्रिपद या सर्व जबाबदाऱ्यांना योग्य न्याय देण्याचे काम अजितदादा करीत आहेत. करोना संसर्गाचा आढावा घेणाऱ्या बैठकीमध्ये नियोजित वेळेच्या काही मिनिटे आधी अजितदादा पोहोचले आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ कशी उडाली, याचा अनुभवही आपण घेतला. वेळ या गोष्टीची किंमत आणि सत्ता हाती असताना वेळीच निर्णय घेण्यामागे असणारे गांभीर्य या दोन्ही गोष्टींचा मिलाप अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येतो.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पुणे