मुंबई – राज्यात अनलॉकिंगच्या दिशेने एक-एक पाऊल टाकण्यात येत असून जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत.
नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नक्की ठरले काय आहे अशी विचारणा होउ लागली व एकदमच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर त्याबाबत खुलासा देत स्पष्टीकरण करण्याची वेळ वडेट्टीवार यांच्यावर आली. अनलॉकच्या 5 लेव्हलला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.
मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे वडेट्टीवार यांनी नंतर नमूद केले. राज्य सरकारमध्ये कुठलिही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या 5 लेव्हला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एचडीएमएने पाच लेव्हल ठरवल्या, त्याला मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊन लादणे हे सरकारचे काम किंवा जबाबदारी नाही.
ज्या भागातील जनतेने सहकार्य केले त्या भागातील लॉकडाऊन कमी करायचा हे धोरण ठरवले आहे. ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट यावरुन पाच स्टेप ठरवल्या, टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचे असं ठरले असून तत्वत: मान्यता मिळाली आहे. मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्री देतील, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुरुवारी दुपारी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर 5 गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि 25 टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यासोबतच या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केली. 18 जिल्हे संपूर्ण अनलाॅक केले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता राज्य सरकराने हा निर्णयच अजून अंतिम झालेला नसल्याचे जाहीर केल्यामुळे यावरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.