नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेथे आमच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, त्यात कोणत्याही गुप्त वाटाघाटी झालेल्या नाहीत, असा खुलासा आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंपैकी एक व देशाचा ऑलिंपिकपटू कुस्तीगीर बजरंग पुनियाने केला आहे.
3 जूनला आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत सरकारकडून आम्हाला या बैठकीबाबत माध्यमांशी काहीही बोलायचे नाही, असे सांगितले गेले. मात्र, गृहमंत्र्यांबरोबर आमच्या कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत पोलीस तपास सुरू आहे, त्यामुळे त्याचा अहवाल येत्या 15 जूनला योणार आहे. तोपर्यंत आंदोलन स्थगित करा, असे शहा व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आम्हाला सांगितले व आम्ही ते मान्य केले, असे बजरंगने सांगितले.
आम्ही रेल्वेमध्ये नोकरी करतो. आंदोलन कालावधीत आम्ही सुट्टी घेतली होती. सुट्टी संपल्याने सही करण्यासाठी गेलो होतो. आंदोलनाच्या आड नोकरी आली, तर ती सोडण्यासाठी तयार आहे, असेही त्याने म्हटले आहे. कुस्तीपटूंनी पोलिसांच्या चौकशी तसेच एकूणच कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रीय यंत्रणांनीच आता यात लक्ष घालावे, तसेच पूर्णपणे निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागीणीही चर्चेदरम्यान करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने याबाबतचे वृत्त दिले जात आहे, त्यामुळे कुस्तीपटूंच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होत आहे. माध्यमांनी ठोस पुरावे देत हे वृत्त दिले तरच त्यांची विश्वासार्हता टिकेल, अन्यथा त्यांच्या वक्तव्यांना कोणीही गांभीर्याने घेणार नाही, असेही बजरंगने सांगितले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
आमच्याच आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंमधील एका अल्पवयीन तरुणीने आपली तक्रार माघारी घेतली तसेच तिच्या वडिलांनी हे माध्यमांना सांगितले. परंतू असे काहीही घडलेले नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मात्र, 16 जूनपर्यंत पोलीस चौकशीतून काय बाहेर येते यावर आमचा पुढील निर्णय ठरेल, असेही त्याने सांगितले.
अजब पुराव्यांची पोलिसांकडून मागणी
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलेल्या अत्याचारांचे तसेच त्यांनी महिला कुस्तीपटूंना मिठीत घेतल्याचे पुरावे सादर करा, अशी अजब मागणी आता दिल्ली पोलिसांनी केली आहे. यावर आता कुस्तीपटूंसह देशभरातील विविध महिला संघटनांनी संताप व्यक्त केला असून, लवकरच याबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचेही सांगितले आहे.