आत्मघातकी दहशतवादी एका दिवसात बनत नाही. ती एक प्रक्रिया आहे. आत्मघातकी दहशतवादाच्या अनेक कारणांची मीमांसा करणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती आत्मघातकी दहशतवादी बनण्यामागे धार्मिक, राजकीय, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक ही कारणे आहेत.
धार्मिक कारण – दहशतवादामागे मोठ्या प्रमाणात धार्मिक कारणे आहेत. आपल्या धार्मिक मूल्यांचे संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट असते. पण बऱ्याच वेळा अतिजहाल मूलतत्त्ववादी विचारसरणी दहशतवादी कृत्याला कारणीभूत ठरते. विशेषत: दहशतवादी संघटना या धर्माच्या जोरावर आपला विस्तार आणि प्रभाव टिकवतात. इसिस तसेच अल-कायदा ही उदाहरणे समोर आहेत.
राजकीय कारणे- ज्या देशातील राज्यकर्ते राज्यकारभार करण्यास पुरसे सक्षम नसतात तेथे नागरिकांमध्ये असंतोष वाढीस लागतो. मानवी हक्क सुरक्षित राहात नाहीत मग दहशतवादी संघटना विस्तार करतात. अफगाणिस्तानमधील तालिबानचा उदय आणि आता इराकच्या विस्कळीत राजकीय परिस्थितीमुळे इसिसचा उदय ही उदाहरणे देता येतील. शिवाय काही राजकीय निर्णय मागे घ्यावेत यासाठीही दहशतवाद माजवला जातो. 11 मार्च 2004 रोजी स्पेनची राजधानी माद्रिद येथे इराकच्या अल-कायदाने बॉम्बस्फोट घडवले होते. यात 192 लोक ठार झाले. निवडणुका केवळ तीन दिवसांवर आल्या असताना हे दहशतवादी हल्ले केले गेले. कारण तेथील पीपल्स पार्टीच्या अझनार यांच्या सरकारने अमेरिकेच्या इराकवरील लष्करी आक्रमणाला पाठिंबा दिला होता. परिणामी या हल्ल्यांनंतर अझनार यांची पीपल्स पार्टी निवडणुकीत हरली.
सामाजिक कारण- सामाजिक स्थैर्य नसेल तर दहशतवाद लवकर रुजतो. गरिबी, शिक्षणाच्या तसेच रोजगाराच्या संधींचा अभाव असणे. मोठ्या प्रमाणात विषमता असणे. अल-कायदा अर्थात “अल कैदा’ची स्थापना ओसामा बिन लादेनने केली. कारण त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये चाललेल्या युद्धामुळे सामाजिक अस्थिरता होती. सोव्हिएत रशियाच्या विरोधात लढण्यासाठी इस्लामिक जगतातून अल कायदाची निर्मिती केली गेली. तसेच सद्दाम हुसेन यांच्यानंतर इराकमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. 2014 मध्ये मग अबू मुसाब अल झरक्वावी याने इसिसची स्थापना केली.
मानसिक कारण- दहशतवाद संघटना सदस्यांशिवाय काम करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांची विचारधारा बाळगणारे सदस्य लागतात. दहशतवादी बनण्यासाठी अनेक मानसिक कारणेही आहेत. वैयक्तिक कारणे जसे प्रतिशोधाची तीव्र इच्छा, काही तरी जगावेगळे करून दाखवण्याची इच्छा तसेच अतिसंवेदनशील असणाऱ्या सदस्यांना हेरून संघटना त्यांच्याकडून हल्ले करवून घेतले जातात.
आर्थिक कारणे- गरिबी, बेरोजगारी, घटलेले उत्पन्न यातूनच मग शिक्षणाचा अभाव आणि सामाजिक विषमता यामुळे समाजात राज्यकर्त्यांच्या विरोधात जनमत तयार होत जाते. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा शासनाप्रतीचा राग व्यक्त करण्यासाठी दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात. मध्य पूर्वेतील अरब-इस्रायलमधील निर्वासितांच्या छावण्यातून दहशतवादी निर्माण होतात. तसेच काही वेळा नैसर्गिक आपत्तीमुळेही दहशतवाद्यांना संधी मिळते. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये 2010 मध्ये मोठा पूर आला होता. तेथील शासन या आपत्तीला फारसे प्रभावीपणे सामोरे जाऊ शकले नाही. त्याचा गैरफायदा घेऊन तालिबानने आपली मुळे घट्ट रोवली. आत्मघातकी दहशतवाद हा जास्त दाहक असतो. कारण यात व्यक्ती स्वत:ला एक शस्त्र म्हणून वापरत असते. जेव्हा ही व्यक्ती मारण्यासाठी तयार झालेली असते, तेव्हा तिला कुणाचेही भय राहिलेले नसते. पोलीस, सुरक्षा यंत्रणा किंवा जनता यांचा कोणताही धाक राहात नाही. दहशतवादी “स्वत:चे मरण हेच टार्गेट’ म्हणून पाहात असतो. त्याचे मरण हेच त्याचे यश असते. आपले ध्येय गाठण्याचा टप्पा म्हणजेच आपले मरण आहे अशीच त्यांची धारणा असते.
आत्मघातकी दहशतवादी आणि संघटना
दहशतवादी संघटना आपल्या विचारधारेला पूरक असणारी व्यक्ती हेरत असतात. त्या व्यक्तीला मग अनेक वेळा “विषारी विचारधारा’ आणि आपल्यावर होणारा तथाकथित “अन्याय’ याचे डोस पाजले जातात. हल्ली हे सर्व ऑनलाइनसुद्धा केले जाते. तो दहशतवादी संघटनेसाठी किती मोलाचा आहे तसेच त्याच्यात किती क्षमता आहे याचे गुणगान गायले जाते. नंतर त्याला शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर त्याची मानसिक तयारी केली जाते. त्याचे कृत्य मुळातच किती पवित्र कार्याचा भाग आहे हे त्याला पटवून दिले जाते. त्याच्या कृत्याचे उदात्तीकरण करणारी आणि बुद्धीला पटणारी कारणे त्याला दिली जातात. अन्यायाचा प्रतिशोध घेणे कसे महत्त्वाचे आहे इत्यादी त्याला पटवून दिले जाते. मग हळूहळू ही व्यक्ती आपल्या सामाजिक जीवनातून वेगळी होत जाते. आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर जाऊ लागते. काही जण कुटुंबात असून मनाने अलिप्त होत जातात. काही जण घर सोडून देतात. मग त्याचे मन पूर्णपणे एकाच विकृत ध्येयाने भारले जाते. टार्गेट ठरते. दिवस आणि वेळ पण ठरते. व्यक्ती जास्तीत जास्त एकांतवास स्वीकारत जाते. शेवटी, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी स्वत:ला स्फोटकाने उडवून दिले जाते.
बदलते स्वरूप
9/11 चा अमेरिकेवरील हल्ला होण्याच्या आधी दहशतवादी संघटनांना सदस्य मिळवणे हे एक आव्हान होते. पण या हल्ल्याच्या नंतर स्वत:हून दहशतवादी संघटनांना येऊन मिळणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण खूप वाढले. तसेच काही वेळा काही व्यक्ती संघटनेच्या प्रशिक्षणाशिवाय हल्ले चढवू लागले. पण विशिष्ट दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचे घोषित करू लागले. अलीकडे तर “लोन वूल्फ ऍटॅक’ वाढलेले आहेत. म्हणजे एकटी व्यक्ती स्वत:च मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणते. हे फार घातक आहे. कोणती व्यक्ती हल्ला चढवणार आहे हे ओळखणे खूप आव्हानात्मक असते. तसेच ही व्यक्ती अगदी बेसावध असणाऱ्या सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवते. आपण जेव्हा मॉल, सार्वजनिक बगिचे, थिएटर अशा ठिकाणी वावरतो तेव्हा आपण खरे तर “सॉफ्ट टार्गेट’ बनलेलो असतो. आपण म्हणूनच खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.
वैयक्तिक कारणांचा प्रभाव
काही आत्मघातकी दहशतवादी विशेषतः स्त्रिया वैयक्तिक कारणांमुळे आत्मघातकी दहशतवादी बनल्याचे दिसून येते. विशेषत: चेचेन दहशतवादाचा विचार केला तर तेथील ब्लॅक विडो या बहुतांश वेळा वैयक्तिक कारणांसाठी दहशतवादी बनल्याचे आढळते. त्यांचे वडील, पती, मुले, प्रियकर यातील कोणीतरी सुरक्षारक्षकांद्वारे ठार केलेले आहेत. त्या स्त्रिया मग प्रतिशोध घेण्यासाठी दहशतवादी बनल्याचे आढळते. पॅलेस्टाइनमध्ये आढळलेल्या आत्मघातकी दहशतवादी महिलासुद्धा काही वेळा वैयक्तिक कारणांसाठी दहशतवादी बनलेल्या आहेत. वफा इद्रीस हिचे वैयक्तिक आयुष्य खूप दु:खाने भरलेले होते. जसे, मृत अर्भकाला जन्म देणे, पुन्हा कधी मातृत्व मिळणार नसल्याचे निदान होणे, नवऱ्याने तिला टाकून देणे इत्यादी. जीवनात काहीही रस उरलेला नाही. मग एखाद्या ध्येयाने भारावून जाऊन स्वत:ला सिद्ध करण्याची मानसिक गरज निर्माण होते. त्यातून मग हा आत्मघातकी दहशतवादी बनण्याचा मार्ग पत्करला जातो. अर्थात, यामुळे दहशतवादाचे समर्थन करता येत नाही. कारणे काहीही असली तरीही विध्वंसक मार्ग निवडणे चुकीचेच असते. कारण, कोणत्याही समस्येवर उपाय असतात. दहशतवाद हा काही पर्याय नाही आणि त्याचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही.