मॅचचे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी दहा धावा हव्या आहेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज षट्कार खेचतो. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौकार बसला नाही तर हातातोंडाशी आलेला सामना गमावण्याची वेळ येणार आहे. शेवटचा चेंडू फलंदाज खेळतो. फिल्डर चेंडूमागे धावत असतो. इकडे दोन्ही फलंदाज जीव खाऊन धावा काढू लागतात… सामना जवळजवळ गमावल्यात जमा आहे… फिल्डरचा थ्रो येईपर्यंत दोनच धावा झाल्या आहेत… पण… अचानक पंच “नो बॉल’ची खूण करतात.
पुन्हा एकदा सर्वांमध्ये उत्साह संचारतो आणि त्या उत्साहाच्या भरात जादा मिळालेल्या चेंडूवर फलंदाज चौकार मारतो. जिंकली..! पण आधीच दमछाक झालेले दोन्ही फलंदाज अचानक पॅव्हिलियनकडे जीव खाऊन धावू लागतात. टीव्हीवर मॅच पाहणाऱ्यांना कारण कळत नाही. पण स्टेडियमवर हजर असलेल्यांना कळतं. पॅव्हिलियनच्या विरुद्ध बाजूनं अतिउत्साही प्रेक्षक मैदानात घुसलेले असतात. ते विजयी फलंदाजांच्या मागे धावत असतात आणि म्हणून फलंदाज जिंकूनसुद्धा पळत असतात. हे दृश्य एखाद्या रणभूमीवर कधी बघायला मिळेल का? युद्ध जिंकणारे सैनिकच मैदानातून कधी पळून जातील का? पण क्रिकेटमध्ये “काहीही’ घडू शकतं, त्यातलाच हा प्रकार! जिंकलेलाच पळून चाललाय, हे दृश्य क्रिकेटव्यतिरिक्त हल्ली दिसू लागलंय ते निवडणुकीत. एखाद्या राज्यात आपली सत्ता येतीये, हे समजल्यावर जिंकलेले आमदार डायरेक्ट राज्याबाहेर पळतायत!
क्रिकेटमधल्या शेवटच्या षटकातलं थ्रिल मतमोजणीत असतं. पारडं सारखं वर-खाली होत असतं आणि त्याबरोबर उमेदवारांचा जीवही वर-खाली होत असतो. सगळ्याच निवडणुकांचे निकाल गुजरातसारखे लागत नाहीत. काही निवडणुकांचे निकाल हिमाचल प्रदेशसारखेही लागतात. कॉंग्रेस आणि भाजप या प्रमुख दोन पक्षांमध्ये जेव्हा रस्सीखेच सुरू होती आणि दोन्ही पक्षांमध्ये तीन-चार जागांचाच फरक दाखवला जात होता, तेव्हा अपक्षांनी काय-काय स्वप्नं पाहिली असतील राव..! पण अपक्षांच्या दुर्दैवानं शेवटी-शेवटी पारडं एका बाजूला झुकलं आणि कॉंग्रेसची सत्ता येणार, हे स्पष्ट झालं.
लागोपाठ बातमी आली, कॉंग्रेस आमदारांना चंडीगडला हलवणार..! कुणी म्हणालं, राजस्थानात नेणार. कुणी-कुणी तर आमदारांना जिथं ठेवलं जाणार आहे, त्या रिसॉर्टचं नावसुद्धा सांगू लागले. कॉंग्रेसचं सरकार असलेल्या राज्यातल्या कुठल्यातरी रिसॉर्टची चांदी होणार, हे स्पष्ट झाल्यावर आम्हाला क्रिकेट सामन्यातला उपरोक्त सीन दिसला. राज्य आपलं, मतदारसंघ आपला, जिंकलोय आपण, मतदार पाठीशी, तरी पळायचं? की सगळे आपल्या बाजूनं आहेत म्हणूनच पळायचं? ही पळापळ हल्ली पुनःपुन्हा का दिसून येतीये? का हरण्यापेक्षा लोकांना जिंकण्याची भीती वाटू लागलीये? झाडी-डोंगर कमी होत असताना “रिसॉर्ट कल्चर’इतक्या वेगानं का वाढतंय?
थोडक्यात, पराभव पचवण्यापेक्षा विजय टिकवणं अवघड झालंय. आपण जिंकूनसुद्धा हरू, या भीतीनं आमदारांना राज्याबाहेर नेलं, तरी कधीतरी परत यावंच लागणारंय ना? राज्याचा राज्यकारभार तरी राज्यातूनच करावा लागेल ना? शपथ राज्यातच येऊन घ्यावी लागेल ना? आणि सर्व काही सुरळीत झालं, तरी आत्ता दिसत असलेली भीती पुढील पाच वर्षे चेहऱ्यावर दिसणारच नाही याची काय गॅरंटी? दर तीन महिन्यांनी रिसॉर्टवारी करणं सगळ्यांनाच कुठे शक्य असतं?