पुणे – “मी मुख्यमंत्र्यांना अकरा प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अन्यथा आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेपाठोपाठ आक्रोश मोर्चा काढू,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर, पक्षांतरासाठी भाजपच्यावतीने दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारपासून महाजनादेश यात्रा काढत आहेत. या यात्रेदरम्यान त्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? धनगर आरक्षणाचे काय झाले? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत ती दिली नाहीतर या मोर्चापाठोपाठ आम्ही आक्रोश मोर्चा काढू. आजच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांनी भाजप प्रवेश केला. यावर “मेगाभरतीची घोषणा सरकारने केली होती. ती मेगाभरती मात्र राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची भाजपमध्ये होती,’ असा टोलाही त्यांनी लगावला.