धोम धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
वाई – गत आठवडाभरापासून वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरु असून तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने धोम-बलवकडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बुधवारी बलकवडी धरण 89 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सध्या 1283 क्यूसेक इतक्या प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धोम धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
मागील एक आठवडाभर तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून 3.65 टीएसी पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात बुधवारी 34 मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून आजअखेर 1939 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बलकवडी धरणात 2833 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून 700 क्सूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तद्नंतर तो वाढवून सांडव्यातून 983 क्यूसेक तर पॉवर हाऊसमधून 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या धोम धरण 57.60 टक्के भरले असून 7.77 टीएमसी पाणी साठा झाला आहे. सध्या धरणात 6896 क्सूसेक पाण्याची आवक धरणात सुरू आहे. यामुळे लवकरच धोम धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. धोम-बलकवडी धरणावर जवळ पास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाने चांगली सुरुवात केल्याने यावर्षी खरीप हंगाम समाधान कारक शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पडत असलेल्या अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना ठोस उत्पादन घेता आले नाही.