उच्च शिक्षणमंत्री सामंत : सर्वांना विश्वासात घेण्याचा सल्ला
पुणे – करोनामुळे शाळा कधी सुरू करायच्या, याबाबत केंद्र सरकारने पालकांकडून सूचना मागवल्या आहेत. त्याच धर्तीवर “विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना विश्वासात घेतल्यास केंद्र सरकारला “यूजीसी’चा निर्णय बदलावा लागेल,’ असा सल्ला उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा घेण्यावरून अजूनही एकमत नाही. राज्य सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्याचे विद्यापीठांना सूचित केले आहे. तर, “यूजीसीने निर्णय मागे घ्यावा,’ अशी मागणी राज्य सरकारने परीक्षासंदर्भात केली आहे. मात्र, परीक्षा घेण्यावर “यूजीसी’ ठाम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत गोंधळ वाढत आहे.
या वादात तंत्रशिक्षणाची शिखर संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही (एआयसीटीई) “यूजीसी’च्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता “एआयसीटीई’ अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांनाही परीक्षा घेणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची अंतिम वर्ष परीक्षेवरून मोठी कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकारण सोडून हा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.