कोलकता -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी भाजपचा उल्लेख सर्वांत विध्वंसक पक्ष म्हणून केला. विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारे पाडण्यासाठी केंद्राकडून कारस्थाने रचली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजस्थानमधील राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर तृणमूलच्या पहिल्या डिजिटल सभेत ममता बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातचे आहेत. त्याचा संदर्भ घेऊन ममता म्हणाल्या, गुजरातने सर्व राज्यांवर सत्ता का गाजवावी? दोन भावांच्या राजवटीला आम्ही जुमानणार नाही.
एक देश, एक पक्ष अशी व्यवस्था आणा. देशात संघराज्यीय रचनेची गरज काय? गुजरातमधील किंवा बाहेरील लोक नव्हे; तर पश्चिम बंगालचा कारभार बंगाली जनताच पाहील. संपूर्ण देश सध्या करोना संकटाशी लढा देत आहे. मात्र, मध्यप्रदेशनंतर राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील लोकनियुक्त सरकारे अस्थिर करण्यात भाजप व्यस्त आहे, असे त्या म्हणाल्या.
पुन्हा निवडून आल्यास आजीवन मोफत धान्य
पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे डिजिटल सभेच्या माध्यमातून ममतांनी आगामी निवडणुकीसाठीचे रणशिंगही फुंकले. तृणमूल तिसऱ्यांदा निवडून आल्यास बंगालमधील जनतेला मोफत धान्य आणि आरोग्यसेवा उपलब्ध करू. जनतेला आजीवन मोफत धान्य पुरवले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.