अमरावती –आंध्रप्रदेशात १३ मे यादिवशी एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. ते टपालाद्वारे झालेल्या मतदानासह ८१.८६ टक्के इतके भरघोस ठरले. मोठ्या प्रमाणातील मतदानाकडे आंध्रात सत्ताबदल होण्याचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
आंध्रात लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ जागा आहेत. त्या राज्यात सध्या वायएसआर कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. मात्र, त्या पक्षापुढे तेलगू देसम पक्ष (टीडीपी), जनसेना आणि भाजप यांचा समावेश असणाऱ्या एनडीएने मोठे आव्हान उभे केलेले दिसले. कॉंग्रेसही रिंगणात असल्याने आंध्रात तिरंगी लढत होणार आहे. त्या राज्यात चौथ्या टप्प्यावेळी मतदान झाले. त्यावेळी ८०.६६ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. तर, टपालाद्वारे १.२० टक्का मतदानाची नोंद झाली.
आंध्रात मागील निवडणुकांवेळी (वर्ष २०१९) ७९.७७ टक्के, तर २०१४ मध्ये ७८.४१ टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढल्यास सत्ताबदलाची शक्यता बळावते. ते समीकरण आंध्रात लागू होणार का याविषयीची उत्सुकता आता ताणली गेली आहे. मात्र, प्रत्यक्ष निकालासाठी ४ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.