केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी एका मोठ्या विषयाला हात घातला आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आता क्रीडा मंत्रालय पुढाकार घेणार आहे. ही चांगली बाब आहे, पण क्रिकेटमय देशात अन्य खेळांसाठी दुजाभाव असतो तो आधी दूर झाला पाहिजे. त्यासाठी केवळ खेळांना लोकाश्रय मिळून उपयोग नाही तर राजाश्रयही मिळाला पाहिजे. “खेलेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया’ हे सूत्र हाती घेतले गेले पाहिजे.
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. मात्र, त्याकडे गेले कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. अंतर्गत राजकारण, मोठ्या नावांना मातीमोल करत आपलेच घोडे पुढे दामटण्याचे उद्योगही झाले आहेत. केवळ हॉकीच नव्हे तर क्रिकेट वगळता जवळपास सर्व ऑलिम्पिक खेळांकडे कमालीचा कानाडोळा झालेला आहे. केवळ बॅडमिंटन व टेनिससाठीच क्रिकेटच्या छायेतही प्रायोजक पुढे आले आहेत. भारतात खरोखरच क्रीडा संस्कृती रुजवायची असेल तर प्रत्येक खेळासाठी अद्ययावत सुविधा निर्माण कराव्या लागतील व त्यासाठी मोठ्या रकमेची तरतूदही करावी लागेल.
जरी देशात केंद्र सरकारने अनेक गोष्टी केल्या असल्या तरीही त्या पुरेशा नाहीत. केंद्रीय अंदाजपत्रकात मोठी तरतूद होणे आवश्यक होते. मात्र, तसे घडलेले नाही. उलट डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना जी रक्कम जाहीर केली गेली त्यात काहीही वाढ झालेली नाही. देशात जर ऑलिम्पिक पदक विजेते तयार व्हावेत असे वाटत असेल तर केवळ टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टॉप) सारख्या योजना तयार करून चालणार नाही तर त्यात नक्की कोणत्या खेळाडूंना स्थान दिले जात आहे हे देखील पाहिले गेले पाहिजे. वशिलेबाजीमुळे जशी अनेक क्षेत्रांची वाताहत झाली आहे तशी या योजनेची आणि “खेलो इंडिया’ची होऊ नये इतकीच अपेक्षा आहे.
रिजीजू यांनी काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) देशातील विविध केंद्रांना आजी-माजी खेळाडूंची नावे दिली जाणार आहेत. स्तुत्य उपक्रम आहे पण त्यातून खरेच प्रेरणा मिळणार का, हा प्रश्न आहे. प्रत्येक खेळाडूला देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा असते. मात्र, यात प्रत्येकालाच देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही, मिळते ते खेळाडू नशीबवान. जे या स्वप्नातच रमतात किंवा राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा जे खेळाडू वरच्या स्तरावर देशाचे नाव उंचावू शकतात असे खेळाडू ओळखता आले पाहिजेत. अर्थात ही मागणी काही नवीन नाही. यापूर्वीही या मतांची पारायणे झालेली आहेत पण हाती काहीही लागलेले नाही.
देशातील जनता क्रीडा क्षेत्राकडे प्रेक्षक म्हणून वळत नाही ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही. देशात क्रिकेट हाच एकमेव खेळ आहे असे मानले जाते. आपल्या देशात क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जाते आणि पाहिलेही जाते. क्रिकेटप्रमाणेच इतर खेळही खेळले गेले पाहिजेत. प्रेक्षक मिळाले म्हणून क्रिकेट वाढले. अन्य खेळ आणि खेळाची आपल्याला ओळखच नाही. खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे, तरच परिस्थिती बदलेल. मात्र, त्यासाठी अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन राखला गेला पाहिजे. 2004 साली राजवर्धन राठोडने ऑलिम्पिकचे पदक जिंकल्यापासून जवळपास प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपण पदके मिळवित आहोत. मात्र, अपेक्षित आहे ती क्रीडासंस्कृती रुजली का, हा प्रश्न कायम आहे.
यंदाच्या वर्षी जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून भारतीय खेळाडू मेहनत करत आहेत. त्यातील काही खेळाडूंनी विविध पात्रता स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करत पात्रता मिळवली आहे. येत्या काळात आणखीही काही पात्रता स्पर्धा होणार असून त्यातूनही अनेक खेळाडू ऑलिम्पिक पात्रता मिळवतील. आंतरराष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल अशा विविध स्पर्धांमध्ये भारताच्या खेळाडूंनी जी तडफदार कामगिरी केली त्यांच्याकडूनच पदकाची अपेक्षाही केली जात आहे. मात्र, जे खेळाडू खरोखरच ऑलिम्पिक पदक मिळवू शकतात त्यांना हेरण्याचे काम कोण करणार? ज्या पद्धतीने शेकडो सामने खेळलेल्या खेळाडूंना शिकवण्याची गरज नसते त्यामुळे प्रशिक्षक त्यांना शिकवत नाही तर केवळ मार्गदर्शन करतो, त्याचप्रमाणे ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंना प्रशिक्षकांची नव्हे तर मेन्टॉरची गरज आहे. असा सपोर्ट स्टाफ भारतात क्रिकेटच्या बरोबरीने सर्व खेळांसाठी सज्ज करण्यात आला तरच ही परिस्थिती बदलेल व देशालाही ऑलिम्पिकची पदके मोठ्या प्रमाणावर मिळतील.
रिजीजू म्हणतात, देशाच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत वाढ झाली पाहिजे, मात्र त्यापूर्वी तळागाळापर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत. शालेय जीवनातच खेळाचे महत्त्वही पटवले गेले पाहिजे. आपल्याकडे 10 वी किंवा 12 वीच्या परीक्षेमुळे विद्यार्थांना खेळापासून लांब केले जाते व पर्यायाने ड्रॉपआउटचे प्रमाण वाढते तशी परिस्थिती चीन, रशिया, अमेरिका तसेच अन्य देशांत होताना दिसत नाही. कारण शिक्षणाबरोबरच खेळातही कारकीर्द घडवता येते याची त्यांना जाणीव आहे. अशा लाखो खेळाडूंना घरातूनही पाठिंबा मिळतो. आपल्याकडे या परीक्षांचा बागुलबुवा इतका आहे की खेळाडूंचा खेळच बंद केला जातो व परीक्षेच्या टक्केवारीची गणित सुरू केली जातात. अर्थात, पालकांचेही समुपदेशन केले जावे असे वाटते. प्रत्येक खेळाडू सचिन, धोनी, कोहली किंवा सानिया मिर्झा होणार नाही हे मान्य, पण त्यांचे वारसदार तरी मिळवायला प्रयत्न का केले जात नाहीत. शिक्षण आवश्यक आहेच पण खेळही तेवढाच महत्त्वाचा आहे, हा विचार जेव्हा जनसामान्यांपर्यंत पोहोचेल त्या वेळी क्रीडासंस्कृती निर्माण करण्याची गरजच पडणार नाही.
– अमित डोंगरे