नवी दिल्ली -बॉर्डर-गावसकर मालिकेत कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. यातील ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या महत्त्वाच्या गोलंदाजाला दुखापत झाली होती. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला ग्रोइन स्ट्रेनची दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यात तो आपले सर्वश्रेष्ठ योगदान देवू शकला नाही. मात्र तरीही त्याने कर्णधाराचे न ऐकता 5 षटके गोलंदाजी केली होती.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी म्हणाला, “अजिंक्य भाईने मला विचारले की मी या दुखापतीत गोलंदाजी करू शकशील का? मला फक्त हो म्हणावे लागले. भारतीय संघाचा 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने अथक मेहनतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. ही मिळालेली संधी नवदीपला गमवायची नव्हती. यावर नवदीप सैनी म्हणाला की त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करून दुखापत अजून वाढवून घेण्याची जोखीम घेतली.
नवदीप सैनी गाबा येथे फक्त 7.5 षटके गोलंदाजी करू शकला. ही पहिल्या डावातील गोष्ट आहे. मात्र त्याने आपल्या संघातील इतर खेळाडूंना आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत केली.
नवदीप सैनी म्हणाला,” मी सामन्यापूर्वी ठीक होतो; परंतु अचानक दुखापत झाली. मी विचार करत होतो की, हे सगळं एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात का होत आहे. खूप कालावधीनंतर भारतीय संघाकडून मला खेळण्याची संधी मिळाली होती. दुखापत झाल्यावर कर्णधाराने मला विचारले होते की मी खेळू शकेल का? मला वेदना होत होत्या. परंतु मी सांगितले, जे करता येईल, ते करण्यासाठी मी तयार आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळी जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. मात्र या संघात नवदीप सैनीची निवड करण्यात आली नाही.