मुंबई – पहाटेची अजान स्वतः मुस्लीम समाजाने बंद केली आहे, पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूंचे अधिक नुकसान झाले आहे. मुंबईत एकूण 2404 मंदिरे आणि 1144 मस्जिद आहेत. कालपर्यंत केवळ 20 मंदिरांकडे परवानगी आहे, तर 922 मशिदींकडे परवानगी आहे. 5 मंदिरांचे व 15 मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकले तर मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत अशा शब्दांत कॉंग्रेसकडून मनसेला लक्ष्य करण्यात आले.
सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात आवाजाच्या तीव्रतेवर मर्यादा घालण्यात आली. या व्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही, असे मत सचिन सावंत यांनी व्यक्त केले. तसेच मनसेच्या या भूमिकेतून मनसेमध्ये किती अज्ञान आहे हे स्पष्ट होते, असा टोला लगावला. सावंत यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई पोलीस ऍक्ट 38(1) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले किंवा रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते, असे त्यांनी नमूद केले.