कोलकाता – नागरिकत्व दुरूस्ती कायदा हे एक वास्तव असून करोना संपुष्टात आल्यानंतर तो लागू केला जाईल अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिली. या कायद्याबाबत बऱ्याच अफवा पसरवल्या जात असल्या तरी तो अमलात आणलाच जाईल असे ते म्हणाले.
सीलीगुडी येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले की, ममता दीदींना देशात घुसखोरी हवी आहे. त्यामुळेच हा कायदा कधीच लागू केला जाऊ शकत नाही अशा अफवा पसरवल्या जात असल्या तरी ते चुकीचे आहे. करोनाचा उद्रेक संपल्यावर लवकरात लवकर हा कायदा आणला जाईल.
दरम्यान, शहा यांच्या आजच्या वक्तव्यावर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आपली एकता हीच आपली शक्ती असून कोणाच्या नागरिकत्वाचे नुकसान व्हावे अशी आपली इच्छा नाही. शहा एका वर्षानंतर येथे आले आहेत व ते येथे आल्यावर नेहमीच अशा फालतू गोष्टी सांगत असतात. येथे बोलण्यापेक्षा ते संसदेत याबाबतचे विधेयक का मांडत नाहीत, असा सवाल करतानाच 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार येणार नाही, असा दावाही ममतांनी केला.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून 2019 च्या अखेरीस आणि 2021 च्या सुरूवातीला चांगलेच वातावरण तापले होते. दिल्लीतील शाहीन बागसह देशाच्या विविध भागांत या कायद्याच्या विरोधात आंदोलन झाले होते.