– दीपेश सुराणा
शब्द परिवार साहित्यिक संस्थेच्या वतीने पाचवे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन शुक्रवारपासून (दि. 10) श्रीलंका येथे होत आहे. 15 तारखेपर्यंत हे संमेलन चालणार आहे. संमेलनाचे आयोजक तथा महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनचे अध्यक्ष संजय सिंगलवार यांची याबाबत घेतलेली विशेष मुलाखत.
शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन घेताना मराठीला जागतिक स्तरावर वेगळे महत्त्व मिळवून देणे हा या संमेलनामागील मूळ हेतू आहे का?
विश्व साहित्य संमेलन घेण्यामागे मूळ भूमिका ही नवोदित, उपेक्षित आणि प्रस्थापित साहित्यिकांमध्ये सुवर्णमध्ये गाठणे ही आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचा हेतू आहे. संमेलनासाठी कोणतेही सरकारी अनुदान घेतले जात नाही. साहित्यिक स्व-खर्चाने त्यामध्ये सहभागी होतात.
शब्द परिवारातर्फे यापूर्वी घेतलेल्या विश्व साहित्य संमेलनाचा अनुभव कसा होता?
– शब्द परिवाराच्या वतीने यापूर्वी विदेशातील पहिले साहित्य संमेलन बॅंकॉक येथे 2015 मध्ये झाले. त्यानंतर दुबई, इंडोनेशिया, मलेशिया येथे संमेलन घेतले. आता पाचवे शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन श्रीलंकेला होत आहे. आतापर्यंतच्या संमेलनाचा अनुभव खूपच चांगला राहिला. त्यामध्ये 150 ते 200 साहित्यिक सहभागी होतात. या साहित्य संमेलनात साहित्यिक व रसिकांमधील दरी दूर करण्यावर आमचा भर असतो. संवादात्मक साहित्य संमेलन व्हावे, हा उद्देश त्यामागे असतो. पाचव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत हे आहेत.
विश्व साहित्य संमेलन घेण्यापूर्वी आपण राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेतली. त्यांना कसा प्रतिसाद मिळाला? त्यानंतर विश्व साहित्य संमेलनाची झेप घेण्यात काही अडचणी जाणवल्या नाही का?
– विश्व साहित्य संमेलन घेण्यापूर्वी वर्धा, निगडी, नागपूर, अलिबाग येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलने घेतली. साहित्यिक वर्तुळातील कोणत्याही प्रकारची कंपूगिरी किंवा बडेजाव न करता ही साहित्य संमेलने भरविली. रसिकांना साहित्यिक आनंद देणे, चांगल्या प्रकारचे संमेलन घेणे या हेतूने ही संमेलने घेतली. अलिबाग येथील संमेलन विशेष संस्मरणीय ठरले. त्यामध्ये 850 साहित्यिक सहभागी झाले होते. विश्व साहित्य संमेलन भरविताना विविध अडचणी जाणविल्या. मात्र, त्यावर मात करीत संमेलन भरविले. नियोजनावर विशेष काम केले. त्यामुळे संमेलने चांगली झाली.
श्रीलंकेत होणाऱ्या पाचव्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे स्वरूप काय असणार आहे? त्यामध्ये किती साहित्यिक सहभागी होत आहेत?
श्रीलंकेत होणाऱ्या पाचव्या शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील 110 साहित्यिक सहभागी होत आहेत. साहित्य संमेलनाचे उद्घाटन, परिसंवाद, मुलाखत, गझल मुशायरा, महिला व पुरुषांचे स्वतंत्र कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि समारोप असे पाच दिवसांच्या संमेलनाचे स्वरूप असणार आहे.