नाशिक – 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काल पासून सुरु झाले असून या संमेनलाबाबत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असे ट्वीट करत फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे फडणवीस नाशिकमध्ये असून सुद्धा साहित्य संमेलनात जाणार नाहीत. त्यांच्या या खळबळजनक ट्वीटने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देताना आणि आपली भूमिका मांडताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #साहित्यसंमेलन pic.twitter.com/1v8LIEmPuH
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 4, 2021
देवेन्द्र फडणवीस म्हणाले की, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?
नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव!
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?