मंत्रीपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंचे जनतेला आश्वासन
बीड : राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, बीडचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे सध्या परळीत असून मंत्री झाल्यानंतर प्रथमच ते बीडमध्ये आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी परळीकरांना, बीडकरांना निवडणुकीत जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिलं. तसंच परळी-बीडच्या जनतेचं उत्पन्न दुप्पट करणं हे माझं ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी उशिरा का होईना सत्याचा विजय झाला असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. उशिरा का होईना सत्याचा विजय झाला, सत्याच्या मागे नियती उभी राहिली याचा आनंद आहे. हा इमानदारीचा चमत्कार आहे, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
काही वर्षांपूर्वी भगवानगडावर येण्यापासून अडवणूक करत दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला होता असे विचारले असता त्यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते म्हणून पहिल्यांदा भगवान गडावर गेले तेव्हा त्यांनाही विरोध झाला होता, त्यांच्याही ताफ्यावर दगडफेक झाली होती, मात्र नंतर भगवान गडावर अभूतपूर्व स्वागत झाले, माझ्याबाबतही तसंच घडलं. पूर्वी मी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतो, आता मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक राहीन असे त्यांनी सांगितले.
मंत्रीपदाच्या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना धनंजय मुंडे भावूक झालेले पहायला मिळाले. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात भगवान बाबांची पुण्यतिथी होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्या मोठ्या भावाशी रक्ताचे नाते तोडण्याची भाषा केली होती. पक्षात काहीच स्थान न राहिल्याने तो निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. बेईमान, गद्दार, खलनायक म्हणून पाच वर्ष बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मी वावरलो. त्यानंतर आता ही जबाबदारी मिळाली आहे.