सातारा – बारामतीचे पवार इथे येऊन तुम्हाला द्यायला पाणीच नाही असे जाहीरपणे सांगायचे. आता देवेंद्र फडणवीस यांच्या अभूतपूर्व निर्णयामुळे कलेढोण, मायणीसह गावांमध्ये पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला असताना पवारांचेच बगलबच्चे पाणी त्यांनी आणल्याचा हास्यास्पद कांगावा करत आहेत, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लागावला. कवसकुलीच्या बियांनी कितीही अडचणी आणल्या तरी टेंभू योजनेच्या कामांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन फेब्रुवारीत कामे सुरु करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विखळे येथे टेंभू पाणी संघर्ष समिती आणि ग्रामस्थांच्यावतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात आ. गोरे बोलत होते. कार्यक्रमाला माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव खाडे, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, शिवाजीराव शिंदे, पंचायत समिती माजी सदस्या मेघाताई पुकळे, दीपक खताळ, संजीव साळुंखे, टी. आर. गारळे, पवनशेठ देशमुख, राजेंद्र कणसे, रघुनाथ घाडगे, हणमंतराव देशमुख, सुरेशराव देशमुख, जीवनशेठ पुकळे, जालिंदर माळी, विशाल बागल, सोमनाथ भोसले आणि टेंभू पाणी संघर्ष समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, “”बारामती, फलटणकरांसह मायणी भागातले नेते सक्षम असते तर आपल्याला पाण्यासाठी टाहो फोडावा लागला नसता.
आपल्या हक्काचे 22 टीएमसी पाणी या महाभागांनी सांगलीला दिले. आपल्या भागाला त्यांनी पाणीच शिल्लक ठेवले नव्हते. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहोत. इथल्या अपशकुनी औलादी पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यांनी पाण्याशी, मातीशी गद्दारी करु नये. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही.” विखळेच्या याच स्टेजवरुन 2019 मध्ये पाणी संघर्ष समितीला पाणी देण्याचा शब्द दिला होता. मी पाण्याचा शब्द घेऊनच भाजपमध्ये गेलो होतो. फडणवीस यांनी त्याच वेळी या भागाच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. आता पाण्याचे फेरवाटप होऊन आपल्याला अडीच टीएमसी पाणी मिळाले आहे.”
टेंभूचे पाणी सातारा जिल्ह्याचे असूनही मालक मात्र दुसरेच झाले होते. हायकोर्टात प्रदीर्घ लढा देवून त्यांची जिरवली. पाण्याच्या लढाईत लोधवड्याचे देशमुख कधीच नव्हते. आ. जयकुमार गोरे पाण्याची लढाई यशस्वीपणे लढत आहेत. तेच या भागाला देणार आहेत, असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. मायणीकर कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले होते. मात्र, त्यांनी सायरन वाजवण्यापलिकडे काहीच केले नाही. आम्ही केलेल्या कामांचे नारळ फोडणाऱ्या माकडांचे मायणी भागात पेव फुटल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. सदाशिव खाडे, धनंजय चव्हाण, दीपक खताळ, संजीव साळुंखे, टी. आर. गारळे, मेघाताई पुकळे यांची भाषणे झाली.
सात वर्षात सर्व गावांत पाणी पोहचवणार
उरमोडीचे पाणी गावात जात आहे. तारळीचे पाणी मायणी भागात येत आहे. खटावमध्ये आलेले जिहे कठापूरचे पाणी लवकरच माणमध्ये पोहचत आहे. टेंभूचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सात वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक गावात पाणी पोहचवणार आहे. ज्यांना तत्वतः आणि अंतिम मान्यतेतला फरक कळत नाही त्यांचा मेंदू मिरजेला नेऊन तपासावा लागणार असल्याचा टोलाही आ. गोरेंनी लगावला.