– सुनील चौधरी
जनतेच्या समस्येसंबंधी संसदेत लोकप्रतिनिधी प्रश्न विचारतात. पण या प्रश्नांच्या आडूनच काही साटेलोटे करतात, असे आरोप होत आहेत.
तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा अडचणीत सापडल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या एका खासदाराने त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. निशिकांत दुबे हे त्यांचे नाव असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे. महुआ यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी कथितपणे लाच घेतल्याचा दुबे यांचा आरोप आहे. हा आरोप त्यांनी स्वत: केलेला नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाच्या पत्राच्या हवाल्याने त्यांनी आरोप केला आहे. महुआ यांनी अर्थातच आरोप फेटाळला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनीही केली आहे, त्याचवेळी दुबे यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्राचीही चौकशी पूर्ण केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लोकसभा अध्यक्ष कदाचित या दोन्ही खासदारांच्या मागण्या पूर्ण करतील किंवा करणार नाहीत. मात्र या गंभीर आरोप-प्रत्यारोपामुळे सर्वोच्च व्यासपीठावर प्रतिनिधित्व करणाऱ्यांच्या हेतूंबद्दल आणि त्यांच्या आचरणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे असले प्रकार खरेच होतात का आणि जे समोर आले ते आपल्याला समजले, जे समोर आले नाही ते असेच राजरोसपणे पडद्यामागे सुरू तर नसेल ना अशी शंका त्यामुळे डोकावते आहे आणि त्यामुळे सगळ्याच प्रतिनिधींबाबत एक अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्ष 2005 मध्ये एक गंभीर घोटाळा उघड झाला होता. संसदेत प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात काही खासदारांनी ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले होते. याचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते.
त्याचे प्रसारणही एका खासगी वाहिनीवर झाले होते. दिल्लीतील एका न्यायालयाने या 11 खासदारांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. बरे यात केवळ कोणत्या एका पक्षाचे खासदार नव्हते. तर बहुजन समाज पक्ष, कॉंग्रेस आणि आता मोईत्रांवर ज्या दुबे यांनी आरोप केले आहेत त्यांच्या भारतीय जनता पार्टीचेही सदस्य होते. धक्कादायक बाब म्हणजे राज्यसभेच्याही एका सदस्यो या स्टिंग ऑपरेशनमध्ये पितळ उघडे पडले होते. देशाला हादरवणारीच ही घटना होती. त्याच्या एक दशक अगोदरच संसदेत सरकारवरील विश्वासमत प्राप्त करण्यासाठी एका पक्षाच्या काही खासदारांना मोठी रक्कम दिल्याचे उघड झाले होते. नंतर त्या खासदारांवर कारवाई झाली; पण त्यांची ही कृतीच लोकशाहीला लांच्छन आणणारी ठरली होती.
मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील एका प्रख्यात समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लाभाचे प्रश्न विचारण्याकरता महुआ मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. मोईत्रा आणि संबंधित उद्योगपती यांच्यात झालेला व्यवहार नाकारता येणार नाही, असे पुरावे असल्याचा दावा केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार 2014 मध्ये सत्तेत आले. या सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारचे एकमेव प्रखर टीकाकार होते. 2019 मध्ये मोदी यांना दुसरी टर्म मिळाली त्यानंतर राहुल गांधी यांना विरोधकांकडून चांगले पाठबळ मिळाले. सरकार विरोधी टीकेची आघाडी सभागृहात सांभाळणाऱ्या पक्षांमध्ये तृणमूल कॉंग्रेस हा पक्ष सगळ्यात पुढे होता.
त्यातही महुआ मोईत्रा यांची काही विधाने असतील अथवा सरकारच्या कारभाराची चिरफाड करणारी त्यांची भाषणे असतील ती सोशल मीडियावर प्रचंड गाजली होती. त्यामुळे मोईत्रा या दिल्लीतील ममता बॅनर्जी आहेत अशी त्यांची प्रतिमाही तयार होऊ पाहत होती. तथापि, आता त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. गेल्या काही काळात उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या सातत्याने चर्चेत आहेत. अदानी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली कथित जवळीक विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असते. या टीकाकारांमध्ये मोईत्रा सगळ्यात पुढे आहेत. त्यांनी आतापर्यंत सभागृहात 61 प्रश्न विचारले आहेत. यातील 50 प्रश्न मुंबईतील त्या उद्योगपतीचे हितसंबंधांचे रक्षण करणारे किंवा त्याला फायदेशीर ठरू शकतील अशा स्वरूपाचे आहेत.
तक्रारकर्त्या वकिलाच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न मुख्यत: अदानी यांना लक्ष्य करणारेच होते. मोईत्रांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले. त्यांची ही कृती म्हणजे आपली खरी बाजू झाकण्यासाठीच होती. सरकारची प्रखर टीकाकार अशी प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशानेच हे केले जात होते. मोईत्रा आणि त्यांचे सहकारी सौगता रॉय यांचा उल्लेख “शाऊटींग ब्रिगेड’ असाही त्यांनी केला आहे. संसदेत सतत गोंधळ घालायचा आणि कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्याकडून केला जात होता आणि कोणतेही निमित्त त्याकरता पुढे केले जात होते. त्यांनी अशी कृती करून अन्य लोकप्रतिनिधींच्या हक्कांची पायमल्ली करण्याचाच प्रकार चालवला होता. मोईत्रा यांचा खरा चेहरा उघड झाला असून स्वत:ला फायरब्रॅंड म्हणून सिद्ध करणाऱ्या नेत्याचा अंतस्थ हेतू वेगळाच होता असाही वकिलाचा दावा आहे.
विशेष म्हणजे अगोदर हिंडेनबर्ग आणि नंतर जॉर्ज सोरस प्रकरणावरून बचावाच्या भूमिकेत गेलेल्या अदानी समूहानेही पहिल्यांदाच मोईत्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. आमचे नाव आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी काही मंडळी ओव्हरटाइम करत होते असे त्यांनी म्हटले आहे. मोईत्रांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाकडे सबळ पुरावे असल्याचा दावा जरी निशिकांत दुबे यांनी केला असला तरी मोईत्रांच्या म्हणण्यानुसार त्या वकिलाशी त्यांचा जुना वाद आहे. आपल्याला अश्लील संदेश पाठवणे आणि गैरवर्तन करणे यासंदर्भात आपण अगोदरच त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. लोकसभेच्या कामकाजाच्या संदर्भात ज्या बाबी केवळ प्रतिनिधींसाठी असतात त्याही मोईत्रा यांनी संबंधित समूहाला पुरवल्याचा आणि एकूणच देशाच्या हिताला धोका निर्माण केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
मोईत्रा म्हणत असतील तसे त्यांचे जुने वादही असू शकतात. वकिलाचे म्हणणे शंभर टक्के खरे आहे किंवा कसे हे चौकशीतूनच बाहेर येईल. पूर्वी असा प्रकार झाला आहे. त्यावेळी 11 खासदार त्यात सापडले होते. त्यामुळे महुआ यांच्या विरोधात जर संभ्रम निर्माण झाला असेल किंवा केला जात असेल तर त्यांनी आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी स्वत:च चौकशीला सामोरे जावे. लोकशाहीतील अनिष्ठ बाबींना रोखणे त्यातून सोपे होईल.