सेनेचा वाघ जिल्ह्यातून हद्दपार; पंजाची धुगधुगी कायम
चॉंद शेख
नगर – सोशल मीडियावर सध्या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना नगर जिल्ह्यात घड्याळाच्या (राष्ट्रवादीच्या) बॅटऱ्या शिल्लक राहणार नाहीत, असा शब्द दिला होता, मात्र घडले उलटेच! घड्याळाची टीकटीक कायम राहिली अन् कमळाच्याच पाकळ्या गळाल्या. श्रीगोंदा व शेवगाव-पाथर्डीत शेवटच्या टप्प्यात आघाडी मिळाली नसती तर भाजपला शिर्डीच्या अवघ्या एका जागेची नामुष्की पत्करावी लागली असती! शिवसेनेचा वाघ तर जिल्ह्यातून हद्दपारच झाला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या रूपाने कॉंग्रेसचे केवळ खाते उघडेल अशी शक्यता असताना तीन पैकी दोन जागा जिंकत पंजाची धुगधुगी कायम राहिली.
निवडणूक जाहीर झाली तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून मातब्बर नेते भाजप-सेनेत जाऊ लागले. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही कॉंग्रेसचे अस्तित्वच शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती झाली. त्यातच सहा महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-उत्तर दोन्ही जागा युतीने मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्याने याला अधिकच पृष्टी मिळत गेली. त्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपत येवून खासदार झालेले उत्साही सुजय विखे जोशात मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या घडयाळातील साऱ्या बॅटऱ्या काढून घेवू असे आश्वासन देवून मोकळे झाले. दोन्ही कॉंग्रेसमध्ये पण लढत देवू असे चैतन्य वातावरणात अन प्रचारात कुठे दिसत नव्हते. मात्र जेंव्हा निकाल यायला सुरुवात झाली. तेंव्हा मात्र अनेक निकाल प्रस्थापितांना विशेषतः युतीला हादरे देणारे ठरले!
सन 2014 ला भाजपने जिल्ह्यातील पाच व शिवसेनेने एक अशा युतीला सहा जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन अशा आघाडीला सहा जागा होत्या. पक्षीय हे बलाबल समान होते. मात्र या पाच वर्षात बरेच पाणी जिल्ह्यातील नद्यांखालून वाहून गेले. कॉंग्रेसचे मातब्बर नेते राधाकृष्ण विखे भाजपत गेले. त्यांनी अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनाही भाजपत नेले.इकडे कॉंग्रेसचे दुसरे आमदार भाऊसाहेब कांबळे हे पण मातोश्रीच्या आश्रयाला गेले. श्रीगोंद्यात तर आमदार राहुल जगताप यांनी तलवारच म्यान करून टाकली. येथील कॉंग्रसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी भाजपत प्रवेश केला. पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे भाजपत गेले. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसला बुरे दिन सुरू झाल्याची चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात निकाल युतीला हादरे देणारे व आघाडीला सुखावणारे आले!
भाजप
सत्ताधारी भाजपने अकोले, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या आठ जागा लढविल्या. यातील एकही जागा भाजपच्या डेंजर झोनमध्ये नव्हती. मात्र निकालात तब्बल पाच जागा त्यांच्या हातातून निसटल्या. केवळ शिर्डी, शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंद्याच्या जागेवर त्यांना समाधान मानावे लागले. त्यातही शिर्डी वगळता इतर दोन ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आघाडी मिळाली नसती तर केवळ एका जागेवर भाजपाचे कमळ उमलले असते!
शिवसेना
शिवसेनेने जिल्ह्यात पारनेर, नगर शहर, श्रीरामपूर व संगमनेर या चार जागा लढविल्या. यातील संगमनेरच्या जागेचा विषय नव्हता पण उर्वरित तीन जागांवर त्यांना विजयाची खात्री होती पण प्रत्यक्षात चारही जागी सेनेचा वाघ गुरगुरलाच नाही. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर हे तीनही निकाल सेनेसाठी अनपेक्षित आले.श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसमधून आलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर सेनेने विश्वास दाखविला पण त्यांना बाहेरच्या कॉंग्रेसचे उमेदवार लहु कानडे यांनी आस्मान दाखविले. नगर शहरात मागील वेळी पराभूत झालेले व पाच वेळा आमदार राहिलेले सेनेचे उपनेते अनिल राठोड परत विजयी होतील अशी आशा होती पण राष्ट्रवादीच्या यंग ब्रिगेडमधील संग्राम जगताप यांनी सलग दुसऱ्यांदा त्यांना मात दिली. पारनेरमध्ये सेनेला प्रचंड हादरा बसला. येथे विधानसभेचे विद्यमान उपसभापती विजय औटी यांना त्यांचेच चेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत जाऊन आस्मान दाखवले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसने अकोले, कोपरगाव, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड या आठ जागांसह नेवाशाचे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पुरस्कृत केले व तो प्रयोग यशस्वीही झाला. या नऊ जागातील शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा या दोन जागा थोड्या मतांनी गमवाव्या लागल्या. तर कोपरगावची जागा त्यांनी कमी मतांनी जिंकली. सात जागा मिळविण्यात त्यांना यश आले. 2014 पेक्षा यावेळी राष्ट्रवादी तीन जागा प्लसमध्ये आहे. त्यामुळे घड्याळाची टीकटीक जिल्ह्यात वाढणार आहे.
राष्ट्रीय कॉंग्रेस
कॉंग्रेसची अवस्था दयनीय झाली असताना मंत्री राधाकृष्ण विखे व श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी साथ सोडल्याने कॉंग्रेसचा पंजा अधिक गहाळ झाला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर एकहाती किल्ला लढविण्याची जबाबदारी आली. मागील वेळीप्रमाणे संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर या तीन जागा पक्षाने लढविल्या. अर्थात शिर्डीत नवखा व परिचित नसलेला उमेदवार दिल्याने या जागेचा निकाल काय लागणार हे अधीच स्पष्ट झाले होते. श्रीरामपूरमध्ये ससाणे व आदिक गटाला बरोबर घेण्यात आल्याने त्याचा कॉंग्रेसच्या उमेदवाराला फायदा झाला. मागील पेक्षा कॉंग्रेसची एक जागा कमी झाली असली तरी अपेक्षा नसताना यावेळी श्रीरामपूरची जागा पदरात पडल्याने कॉंग्रेस खूश आहे. आता त्यांनाही पक्षवाढीला संधी आहे, असे कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना वाटते.
वंचित आघाडी, डावे, मनसे, अपक्ष
आघाडी व युती वगळता जिल्ह्यात दखलपात्र पक्ष व त्यांचा उमेदवार पण दिसला नाही. वंचित आघाडीने बहुतांश मतदारसंघात उमेदवारी दिली पण शेवगाव-पाथर्डीत किसन चव्हाण 9599 मते वगळता कुणाचे अस्तित्व जाणवले नाही. मनसेच्या रेल्वे इंजिनाची धडधड कुठेच जाणवली नाही. डाव्यांचा लाल बावटाही कुठे फडकालच नाही. नगर शहरात त्यांनी उमेदवार दिला होता, तर अकोल्यात राष्ट्रवादीचा विजय सुकर करण्यासाठी त्यांनी माघार घेतली. पारनेरमध्ये उमेदवार देण्याची घोषणा हवेतच विरली. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नगर जिल्ह्याला आता कधी तिरंगा तर कधी भगवा भावू लागला आहे. इतर एएमएमआयएम, सपा-बसपा, राष्ट्रीय समाज पक्ष यांचे जिल्ह्यात कुठे अस्तित्व जाणवलेच नाही. बहुतांशी बंडोबांना थंड करण्यात त्या-त्या पक्षाचे पंक्षश्रेष्ठी यशस्वी झाले होते. केवळ कोपरगावमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या बंडखोऱ्या काळेपेंक्षा कोल्हेंना जास्त त्रास देवून गेल्या.
लाल दिव्याचा मान जिल्ह्यात कुणाला?
शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस अशा विचित्र समीकरणाची चर्चा व्हायरल होत असली तरी असा प्रयोग होण्याची शक्यता खूपच धुसर आहे. त्यामुळे पुन्हा भाजप-सेनेचे सरकार येणार हे उघड आहे.शिवसेनेचे मंत्रीपदाचे दोन्ही प्रबळ दावेदार विधानसभेचे उपसभापती विजय औटी (पारनेर) व उपनेते अनिल राठोड (नगर शहर) पराभूत झाले आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते व मोनिकाताई राजळे हे तिघे विजयी झाले. परत पालकमंत्री होवू शकणारे राम शिंदे मात्र पराभूत झालेत. त्यामुळे विखे, पाचपुते व राजळे यांच्यापैकी जिल्ह्याचा लाल दिवा कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसे हे तिघेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून पक्षातंर करून आलेले आहेत.
विखे ज्येष्ठ आहेत पण भाजपला ते अपेक्षित यश मिळवून देवू शकलेले नाहीत. त्यांच्या मुलाने अर्थात खासदार सुजय विखे यांनी काही जागा पाडल्याचा आरोप होवू लागला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदच मिळेल की नाही ही शंका आहे. त्यात भाजपाच्या नवनिर्वाचीत आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह पराभूत आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले,स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेत विखे यांना मंत्रीपद देवू नये अशी मागणी केली आहे. तसे झाले तर पाचपुते व राजळे यांचा विचार होवू शकतो.मात्र. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे यांना ताकद देण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर घेवून परत पालकमंत्रीपद दिले जावू शकते असाही तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचा लाल दिवा कुणाला याचीच सध्या चर्चा आहे.