महामार्ग कचरामय : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उरूळीकांचन – उरुळीकांचन (ता. हवेली) येथे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावली जात नाही. नसल्याने महामार्गलगत कचऱ्याचे ढीग साचत आहे.
उरुळीकांचन येथे प्लॅस्टिक बंदीकरीता अनेक दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर प्लॅस्टिक कचरा कमी होणे अपेक्षित असताना कचऱ्याच्या ढिगात मोठ्याप्रमाणात प्लॅस्टिकच आढळून येत आहे. उरूळीकांचन परिसरातील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यातच नागरिक रस्त्यालगत कचरा टाकत आहेत.
चिकन, मटण, हॉटेल व्यवसायिक दुर्गंधीयुक्त कचरा टाकत असून तो कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यातून परिसरात डास, चिलटे, माशा याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामंचायतीने या कामी लक्ष द्यावे, परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.