मुंबई – लॉकडाऊन पासून देशातील कोळशाच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता युरोपातील युद्धामुळे या अडचणीत आणखी भर पडली आहे. विविध उद्योगांना वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ऍल्युमीनीयम, सिमेंट, पोलाद, कागद, खत, रसायने या उद्योगांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. त्यासाठी या उद्योगांनी स्वतःचे वीज कारखाने आपल्या प्रकल्पाच्या जवळ उभे केलेले असतात. मात्र गेल्या वर्षी वीज टंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतर देशातील कोळसा खानींनी फक्त वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविण्यास प्राधान्यक्रम दिला आहे.
त्यामुळे इतर उद्योगांच्या वीज केंद्रासाठी कोळसा उपलब्ध नाही. आता कोळशाची जी थोडीफार आयात होत होती त्या आयातीवर युद्धामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात रशिया व युक्रेनकडून येणारा कोळसा पूर्णपणे थांबला जाण्याची शक्यता आहे. जर कोळसा उपलब्ध झाला नाही तर उत्पादन थंडावणार आहे. कोळसा महाग उपलब्ध झाला तर उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागतील.
यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही अनेक वेळा केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. मात्र याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही असे विविध प्रकल्पाच्या वीज निर्मात्या शाखांच्या संघटनेचे सरचिटणीस राजीव अग्रवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की देशातील कोळसा खानीकडून आम्हाला जो थोडाफार कोळसा मिळतो तो कोळसा प्रकल्पाकडे नेण्यासाठी रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध नाहीत हा आमचा मोठा प्रश्न आहे.