नवी दिल्ली – युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने त्वरीत हालचाल केली पाहिजे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभा खासदार बिनॉय विश्वम यांनी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
विश्वम यांनी परराष्ट्र मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “युक्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप केला गेला पाहिजे. युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांसह 20,000 हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत याची सरकारने जाणीव ठेवली पाहिजे. ते म्हणाले की, युक्रेन मधील हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी बंद करण्यात आले आहे.
त्यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत येणे अवघड बनले आहे. अशा स्थितीत भारत सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे. केवळ हवाई क्षेत्रच नव्हे तर रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीच्या पर्यायाचाही भारत सरकारने विचार केला पाहिजे. रशियाने तेथे अतिशय आक्रमक हल्ले केले आहेत. त्यामुळे तेथील सारीच परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशा स्थितीत तेथील भारतीयांच्या भवितव्याची आपल्याला चिंता करायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे.