पुणतांबा – विधानसभेचे मतदान दहा दिवसांवर आले असतानाही पुणतांबा परिसरात शांतता असून या परिसरातून होणारे मतदान निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या आठ दिवसापासून सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, नातेवाईक यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राहाता तालुक्यातील पुणतांबा, चितळी या महसुली मंडळातील दहा गावांचा समावेश आहे. आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून आशुतोष काळे, अपक्ष राजेश परजणे व विजय वहाडणे यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात आहे.
मात्र खरी लढत कोल्हे व काळे यांच्यातच होणार असल्याची चर्चा आहे. परजणे आणि वाढणे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाची या परिसरात मोठी ताकद असून विखे गटाचे कार्यकर्ते अद्याप कोल्हे यांच्या प्रचारात दिसत नाहीत. सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी परजणे यांच्या प्रचाराच्या प्रारंभास हजेरी लावल्यामुळे विखे गट कोणाचे काम करणार याची चर्चा परिसरात आहे.
कोल्हे यांच्या प्रचाराची अकरा गावात जबाबदारी डॉ. मिलिंद कोल्हे यांच्याकडे असून त्यांनी या भागात संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यांच्यासोबत धनंजय जाधव, गंगाधर चौधरी, शिवसेनेचे महेश कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर आदीजण परिसरात कोल्हे यांची प्रचार यंत्रणा राबवीत आहेत. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या पूर्वाश्रमीचा गट आणि भाजपा शिवसेना महायुतीची ताकद यामुळे आमदार कोल्हे यांचा गड भक्कम झालेला दिसत आहे.
आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे यांनी जोरदार संपर्क मोहीम सुरू केली आहे. सर्व ताकदीनिशी निवडणूक जिंकायचा निर्धार काळे यांनी व्यक्त केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर थोरात आदीजण काळे गटाची प्रचार यंत्रणा राबवीत आहे पुणतांबा परिसरात अद्याप कोणत्याच उमेदवाराची जाहीर सभा झालेली नसून केवळ संपर्क मोहीम सुरू आहे.
प्रचार सभानंतर निवडणुकीत रंग भरणार आहे. गेल्या अनेक निवडणुकीत गाजणारा पुणतांबा येथील पाणीप्रश्न या निवडणुकीत दिसणार नसून कोल्हे व विखे यांच्या प्रयत्नातून 17 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर होऊन या योजनेचे काम सुरू आहे. मात्र परिसरातील गावाचा पाटपाणी हा महत्त्वाचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत ठोस निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी होत आहे.