कर्जत – लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर लादलेला उमेदवार पार्थ पवार याला पराभूत केले. त्याचप्रमाणे आता कर्जत-जामखेडकरांनी धाडस दाखवून आलेले पुण्याहून आलेले पार्सल परत पाठवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पैशाच्या भरवशावर कोणाला निवडणुका जिंकता येत नाही. तसे असते तर टाटा, बिरला, अंबानी लोकसभेत दिसले असते. येथे थोपलेले नव्हे तर लोकांनी घडविलेले नेतृत्व चालते.
धमक्या देऊन कोणाला सत्तेवर येता येणार नाही. तसा प्रयत्न कोणी केला तर त्यांचा बंदोबस्त करू. मते दिली नाहीत, तर तुमचा ऊस साखर कारखान्यात नेणार नाही, अशा धमक्या कोणी देत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यांनी ऊस नाही नेला तर आपण या भागात दुसरा साखर कारखाना उभा करू. या निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ होणार असून दहा टक्केही जागा त्यांच्या निवडून येणार नाहीत. असे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, राम शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील घडलेले नेतृत्व आहे. ते शिकले, प्राध्यापक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री झाले. त्यांनी अत्यंत चांगले काम केले. कोणी त्यांच्यावर नेतृत्व थोपविण्याचा प्रयत्न केला तर मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही. कारण ते सतत जनतेत असतात. याच जनतेच्या जोरावरच ते निवडणूक लढवित आहेत. गेल्या वेळी ते 38 हजार मतांनी निवडून आले होते.
यावेळी त्यांना 50 हजार मतांनी निवडून द्या. आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे. हा काही साधा गडी नाही. तो भल्याभल्यांना पुरून उरला आहे. रामभाऊंनी शेतकऱ्यांसाठी मोठी कामे केली. 3900 कोटी रुपयांची कुकडी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तुकाई चारी योजना, शासकीय कृषी महाविद्यालय आणले, असे अनेक विकास कामे त्यांनी मतदारसंघात केली आहेत.
यावेळी खा. सुजय विखे पाटील, आ.सुरेश धस, बबनराव पाचपुते, नामदेव राऊत, अशोक खेडकर, बळीराम यादव, पप्पू शहाणे, नारायण मोरे, प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र देशमुख, शांतीलाल कोपनर, धनराज कोपनर, कांतीलाल घोडके, समीर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन कारखाना उभारणार : प्रा. शिंदे
या भागातील उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी 2021ला नवीन कारखाना उभा केला जाईल. तोपर्यंत विखे पाटलांच्या कारखान्यात ऊस घेतला जाईल. आपला कारखाना कवडीमोल भावाने घेतला त्याचे काय करायचे ते आता सुजय विखे व मुख्यमंत्री ठरवतील. मतदारसंघामध्ये मी विकासाचा डोंगर उभा केला. सिध्दटेक तीर्थक्षेत्राच्या विकास, तुकाई चारी, कर्जत पाणीपुरवठा, माळढोक असे कित्येक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.