श्रीगोंदा – पाणीप्रश्नात सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे, असे सांगत डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू, असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी “परिक्रमा’चे सचिव प्रतापसिंह पाचपुते, माजी सरपंच विजय शेंडे, वामन भदे यांची भाषणे झाली. अण्णासाहेब शेलार, मिलिंद कुलथे, पंचायत समितीचे प्रशासक डॉ. राम जगताप, सरपंच संध्या शेंडे, उपसरपंच सोनाली भदे, प्रा. सुरेश रसाळ आदी उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले की, महाआघाडी सरकारच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कुकडी प्रकल्पातील नगर जिल्ह्याच्या हक्काचे 22 टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी पळवले. मतदारसंघातील “कुकडी’चा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच त्यात यश येईल. जिल्ह्यातील अवैध वाळूउपसा बंद केला असून, सरकार स्वतः वाळूउपसा करून कमी भावात वाळू उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला आहे. लवकरच अंमलबजावणी होईल. गावकऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. येत्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामांची गंगा आणणार आहोत.
“वेळेला’ विखेंसोबतच : नाहाटा
अडचणीत विखे परिवाराने नेहमीच मदतीचा हात दिला. त्यामुळे राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. सध्या कुठेही असलो, तरी “वेळेला’ विखेंबरोबरच आहोत, असा खुलासा राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी केला.
अण्णांना आम्हीच फिरती खुर्ची दिली : खा. विखे
बाळासाहेब नाहाटा आणि अण्णासाहेब शेलार हे दोन्ही राजकारणी माझ्यापेक्षा “हुशार’ आहेत. तुम्हा दोघांनाही स्वातंत्र्य दिले आहे, तुम्ही कुठेही फिरा, त्यासाठी शेलारांना तर आम्हीच फिरती खुर्ची दिली आहे, असा चिमटा खा. विखे यांनी नाहाटा व शेलार यांना घेतला.