चित्रपटात रंगाच्या उधळणीला काय कमतरता? चित्रपट इस्टमन कलर झाला तेव्हापासूनच चित्रपटात होळीच्या सणाच्या चित्रीकरणाची खास अहमियत आली. चित्रपट रंगीत झाल्यावर तर काय त्याला उधाणच आलं. होळीची गाणी कानावर आली की, कधी प्रियकरावर लटका राग व्यक्त करणारी नायिका तर कधी होळीच्या निमित्ताने नायिकेशी जवळीक साधू पाहणारा नायक असं चित्र आपल्या समोर लगेच येतं पण हिंदी चित्रपटांनी या सणाचा उपयोग यापेक्षाही अधिक गहिरे रंग सादर करण्यासाठी केला आहे. कधी हा सण अन्यायावर विजय मिळवल्याचं प्रतीक असतं तर कधी विधवा पुनर्विवाहासारखा वेगळा विषय मांडतं. अशा वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली होळी…
आपल्याकडील चित्रपट हे आपल्या संस्कृतीशी इतके घट्ट जोडले गेले आहेत की त्यातून सण-समारंभ वगळणं शक्यच नाही. त्यातही होळी हा असा सण आहे की जिथे उत्साहाला उधाण येतं. चित्रपटातही या रंगबिरंगी सणाला जास्त महत्त्व आहे.
होळी हा पहिल्यापासूनच आपल्या मनातल्या नाजूक भावना व्यक्त करायला मिळालेली एक संधी म्हणून पाहिला जाणारा सण आहे. त्यामुळे नायक- नायिकेचं प्रेम, प्रियाराधन आणि रुसवे-फुगवे काढण्याची एक चांगली संधी ही गाणी देतात. अगदी “फागून’ मधल्या “पिया संग खेलू होली’ असे 1960 च्या दशकातले नायिकेचे सलज्ज भाव असोत किंवा “तन रंग लो जी मन रंग लो’ अशी “कोहीनूर’ मधल्या नायकाचं धाडसी आवाहन असो, होळीच्या निमित्ताने ते सांगितलं गेलं. त्यात “नवरंग’ च्या नायक-नायिकेची प्रेमातली तक्रारही होती.
सगळ्यांसमोर करता न येणारं भांडणच “अरे जारे नटखट… पलट के आज दूंगी गाली रे’ मध्ये मांडण्यात आलं आहे. गुरुगृही राहणारा नायक आणि तिथेच विद्या शिकायला आलेली नायिका म्हणजे गुरुभगिनीच; पण प्रेमाला असली बंधनं कुठे कळायला? त्यांच्यात प्रेमही आहे आणि गुरुकुलाचा धाकही. त्यातून एकमेकांवर नेम साधण्याचं निमित्त त्यांना या होळीच्या सणाने मिळतं. त्यातली गोपीकृष्ण आणि संध्याची नृत्यअदा तर काय लाजबाबच!
होळीसाठी कायम मस्तीभरी गाणीच पाहिजेत असाही काही नियम नाही. “लम्हे’चं श्रीदेवीवर चित्रीत झालेलं “मोहे छेडो ना..’ हे गाणं आठवतंय? ठुमरीच्या अंगाने जाणारं आणि गोपी-कृष्णाच्या गहिऱ्या प्रेमाची आठवण करून देणारं गाणं म्हणूनही ते लक्षात राहतं.
होळी म्हटलं की, अमिताभ आणि त्याच्या गहिऱ्या आवाजातलं “रंग बरसे’ कसं काय विसरता येईल? अमिताभ-जया आणि रेखा हा त्याकाळी खरा असावा असा प्रेमाचा त्रिकोण निवडून यश चोप्रांनी अर्धी बाजी मारली होतीच.
नायक-नायिकेला नियतीच्या हातातलं खेळणं बनवून त्यांच्या प्रेमात आड येणाऱ्या सामाजिक बंधनांचा उहापोह करणारा तो त्यावेळचा ज्वलंत विषय होता. होळीच्या जरा मुक्त वातावरणाचा आणि भांग मिसळलेल्या दुधाचा परिणाम म्हणून नायक बायको ऐवजी प्रेयसीची तारीफ करतो. समझनेवाले को इशारा काफी… म्हणत तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या बायकोला खरं काय ते कळतं. या पार्श्वभूमीवर येणारं हे गाणं थोडं मस्तीच्या अंगानं जाणारं. इथे नायक प्रेयसीच्या नवऱ्याची सरळ सरळ खिल्ली उडवतोय. नवऱ्यासाठी केलेला विडा “खाये गोरी का यार..’ असं सगळ्यांसमोर सांगण्याची हिंमत नायक फक्त होळीच्या भांग प्यायलेल्या अवस्थेतच करू शकतो!
होळी आणि भांग यांचंही हिंदी चित्रपटात अतूट नातं आहे. “नमक हराम’ आठवतोय? राजेश खन्नाची सद्दी संपवून अमिताभ-गाथा सुरू झाली ती याच चित्रपटानंतर. इथे अमिताभ खलनायकच. मजुरांना त्यांचे न्याय हक्क मिळू नयेत म्हणून आपल्या मित्राला, राजेश खन्नाला त्यांच्या वस्तीत जाऊन, त्यांच्यातील एक आहे असं भासवून त्यांच्यात भांडणं लावायला सांगणारा. मित्राच्या प्रेमाखातर राजेश खन्नाही त्याला तयार होतो पण नंतर मजुरांची खरी परिस्थिती समजून त्यांच्याच बाजूने मित्राविरुद्ध उभा ठाकतो. एकीकडे मित्रपेम आणि दुसरीकडे सद्सदविवेकबुद्धी यातला संघर्ष रेखाटण्याच्या पार्श्वभूमीवर येतो होळीचा सण. त्यात भांग पिऊन नायिकेप्रती प्रेमभावना व्यक्त करतानाच त्याच्या मनातला संघर्ष दाखवणारं “नदीया से दरीया…’ हे अप्रतिम गाणं. किशोरचा आवाज आणि रेखा- राजेश खन्नाची जोडी… रंग चढायला काय वेळ लागणार सांगा?
राजेश खन्नालाही होळीच्या गाण्यांनी चांगली साथ दिली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी ही गाणी किशोरच्या सदाबहार आवाजात आहेत. “कटी पतंग’ मधलं होळीचं गाणं घ्या. नायिका काही कारणांनी विधवा बनून राहतेय. प्रत्यक्षात तिचं लग्नही झालेलं नाही. होळीच्या दिवशी सगळे “आज ना छोडेंगे …’ म्हणत रंगांचा आनंद लुटत आहेत आणि नायिकेचं आयुष्य मात्र रंगहीन आहे. यावेळी नायक रूढी -परंपरा मोडून नायिकेच्या अंगावर रंग टाकतो. तिच्या बेरंग आयुष्यात रंग भरण्याची त्याची तयारी ही त्याचा पुरोगामीपणाच दाखवते.
होळी हा सण गावकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठीही बरेचवेळा प्रभावीपणे साकारला गेला आहे. “शोले’ च्या “होली के दिन दिल खिल जाते है’ हे यावेळी न आठवलं तरच नवल.
गब्बरच्या अत्याचारांना कंटाळलेल्या गावकऱ्यात वीरू आणि जयच्या पराक्रमाने उत्साह संचारला आहे. बसंतीही वीरूच्या बहादुरीवर खूश आहे. त्यातच होळीच्या निमित्ताने एकमेकांना छेडण्याची संधी त्यांना मिळते. गावकरीही बऱ्याच दिवसांनी खुलेआम आनंद साजरा करत आहेत आणि या बेसावध क्षणी गब्बरचा प्रतिहल्ला होतो! गरम डोक्याचा वीरू शरणागती पत्करायला तयार नाही तर समंजस जय गब्बरचे पाय पकडून माफी मागायचं नाटक करतो. खरा उद्देश असतो तो त्याच्यापर्यंत पोहोचायचा. तिथे पोहोचून खाली वाकल्यावर तिथलाच रंग तो अचानक गब्बरच्या डोळ्यात उडवतो आणि इतका वेळ रोखून धरलेला श्वास प्रेक्षक सोडतात. नायकाच्या या चलाखीला दाद देतात! मग घमासान लढाई आणि गब्बरचं पळून जाणंही लोक एन्जॉय करतात!
ही नव्या जमान्याची कहाणी होती पण “मदर इंडिया’ सारख्या जुन्या चित्रपटातही सावकाराच्या तावडीतून शेत मुक्त करायचं स्वप्न पाहणारा नायक आणि नायिका होळीच्या निमित्ताने आपली खुशी व्यक्त करताना दिसतात. पार्श्वभूमीला “होली आयी रे कान्हाई.. ‘ हे शमशादच्या आवाजातलं गाणं लक्ष वेधून घेत असतं. थोड्याफार फरकाने हाच संदर्भ येतो “मशाल’ मध्ये. दिलीपकुमारच्या उपदेशाने चांगल्या मार्गाला लागण्याचं नायक अनिल कपूर ठरवतो आणि हा बदल “होली आयी रे’ म्हणत नायिकेबरोबर साजरा करतो.
होळीच्या गाण्याचा पगडा इतका आहे की अशा गाण्यांचा वापर “मंगल पांडे’ सारख्या ऐतिहासिकपटातही केला गेला आहे. स्वातंत्र्य उठाव यशस्वी होणार आणि परकीय सत्ता जाणार या स्वप्नात रंगलेल्या नायकाला गावकऱ्यांबरोबर होळीचा सण साजरा करावासा वाटतो आणि त्याचवेळी त्याच्या मनातल्या नायिकेबद्दलच्या भावनाही “देखो आयी होली’ या गाण्यातून व्यक्त होतात. यात मंगल पांडेसाठी खुद्द आमीरनेच पार्श्वगायन केले ही देखील एक वेगळी बाजू म्हणता येईल.
आजवर होळीचा संबंध नायक-नायिकेच्या व्यक्त-अव्यक्त प्रेमभावनेशी होता, पण काळ बदलला तशा त्यातही काही “ग्रे” शेड्स आल्या. “डर’ च्या खलनायकाला म्हणजे शाहरूखला नायिकेजवळ जाण्याची एक संधी हवी असते पण तीही स्वत:ची ओळख न पटवता. मग होळीसारखं दुसरं निमित्त काय? तो नायिकेच्या घरी होळीच्या उत्सवात ढोल वाजवणाऱ्याच्या वेशात जातो. तिथे जुही आणि सनी “अंग से अंग लगा ले सजन मुझे ऐसे रंग लगा ले’ अशी सलगी करत असतात आणि त्याने शाहरूख क्षणाक्षणाला अस्वस्थ होत असतो. शेवटी रंगांच्या आड लपलेल्या चेहऱ्याने तो नायिकेला स्वत:चं अस्तित्व सांगण्यात यशस्वी होतो आणि नायिकेच्या होळीच्या रंगाचा बेरंग होतो. तिच्या मनात “डर’ कायम ठेवायला खलनायकाला निमित्त मिळतं ते होळीचं.
खलनायकच नाही तर “खलनायिका’ही त्यात मागे नाहीत. अनु अग्रवालही जितेंद्रच्या घरात आग लावायला या सणाचा चांगला उपयोग करून घेताना दाखवली आहे. बदलत्या काळाचा “रंग’ दुसरं काय? पण अशी उदाहरणं थोडीच. अमिताभ साठीच्या घरात असताना “होली खेले रघुविरा…’ म्हणत “बागबान’ मध्ये तेव्हा पंचावन्न वर्षांच्या हेमा मालिनीला छेडू शकतो आणि तिही त्याला “साठ बरस के होने को आये..’ म्हणत प्रत्युत्तर देताना दिसते. हे सगळं आपल्या बॉलीवूडमध्ये होळीच्या निमित्तानेच घडू शकतं!
अमिताभ बच्चन आणि बादशाह शाहरुख खान “मोहब्बते’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात बिग बींच्या गुरुकूलमध्ये शाहरुख खान होळी साजरी करताना दिसला होता. “ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील “बलम पिचकारी…’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
होळी विशेष
– अनामिका