पुणे – मी स्वत: विधिमंडळाचा सदस्य असून मी सभागृहाचा आदर करतो. तर मी केलेले विधान एका विशिष्ट गटाबाबत आहे, असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुण्यात केला. मी पुणे दौऱ्यावर असल्याने मला अद्याप विधिमंडळाची नोटीस मिळालेली नाही. परत गेल्यावर नोटीस वाचून मी माझे उत्तर देईल, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वादळ उठले असून विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात आला आहे. तर, खासदार राऊत यांच्या वक्त्व्यांवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेले आहे. राऊत म्हणाले, “मी केलेल्या वक्त्व्यांवरून माझ्या अटकेची मागणी 40 आमदार करत असतील, तर त्यांनी आधी स्वत:च्या अंतरागात पहावे. अद्याप तरी देशातील कायदा, न्यायव्यवस्था आणि पोलीस खोक्याखाली चिरडलेले नाहीत. अजूनही काही रामशास्त्री जिवंत आहे. त्यामुळे आधी या भ्रष्टाचारी आमदारांना अटक झाली पाहिजे. मी विधीमंडळ, संसदेबाबत असे बोलणारा मी माणूस नाही. मला कायदा संविधान, नियम चांगलेच माहिती आहेत.’
कसबा तो बस झांकी है..
कसब्याच्या निकालाबाबत राऊत म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्यासारखा निकाल लागतो. महाविकास आघाडी थोडी इकडे-तिकडे गेली की चिंचवडसारखा निकाल लागतो. कसब्याचा निकाल राज्याच्या भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने एकजूट दाखविल्यास विधानसभेत 200 पेक्षा अधिक जागा असतील. लोकसभेला 40 जागा जिंकू, याचा मला विश्वास आहे. चिंचवडमध्ये आम्ही काही प्रमाणात कमी पडलो. मात्र, चिंचवडचा विजय भाजपचा नसून तो “जगताप पॅटर्न’चा आहे. यातून भाजपने धडा घ्यावा असे सांगत, कसबा तो बस झांकी है…’ असेही राऊत म्हणाले.