नवी दिल्ली : करोनासचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालला आहे. त्यातच जगात या करोनावर लवकरात लवकर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नात भारतही अग्रेसर आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये कोव्हॅक्सीनची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले.
ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होईल, अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.
भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते दीपक सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. या पत्राव्दारे त्यांनी उत्तर प्रदेशात करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंती केली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, उत्तर प्रदेशात 61,698 करोनाच्या ऍक्टिव्ह केसेस आहेत. तीन लाख दोन हजार 689 रुग्ण करोनानुक्त झाले आहेत, तर 5,299 मृत्यू झाले आहेत.