मुंबई – भाजपचे आमदार आणि माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. जयकुमार रावल पर्यटन मंत्री असताना पर्यटन विभागाने मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे एक वर्षाचे टेंडर होते. ते वाढवून पाच वर्षाचे करण्यात आले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना पर्यटन विभागातही आणले होते. या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याचीच तक्रार मी ईडीकडे केली आहे, असे अनिल गोटे यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातले आहे, असा आरोपही गोटे यांनी केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इकबाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतला असल्याचा आरोप गोटे यांनी या पूर्वी केला आहे.
मागील आठवड्यात अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीवर अद्यापही तिकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नसल्याने आता संबंधित प्रकरणाची तक्रार मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे उद्या करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या विरोधात दर आठवड्याला एक तक्रार करून मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.