Sanjay Nirupam – शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नसल्याचा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची गरज असून, काँग्रेसलाही त्यांची गरज आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एकच खळबळ माजली आहे.
निरुपम यांनी कालच ठाकरे गटाने २३ जागा लढवल्या, तर आम्ही कुठे व किती जागा लढवायच्या? असा कळीचा प्रश्न केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला चिमटा काढला आहे.
निरुपम पुढे म्हणाले की, शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यांनी गत निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी बहुतांश खासदार पळून गेलेत. आता त्यांच्याकडे ४-५ खासदारच उरलेत. ते ही त्यांच्याकडे राहतील की नाही याची गॅरंटी नाही.
त्यामुळे, सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची व काँग्रेसला ठाकरे गटाची गरज आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर दोघांनीही संयम राखण्याची आवश्यकता आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांची स्मरणशक्ती क्षीण झाल्याचाही दावा केला. मला कोण ओळखते हे संजय राऊत यांच्यापेक्षा चांगले कुणालाही माहिती नाही, असे ते म्हणाले.
उद्घाटनाचे आमंत्रणच नाही
काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे आमच्या नेत्यांनाही ठावूक नसते. त्यामुळे बाहेरच्या नेत्यांना काय माहिती असणार? असा सवालही संजय निरुपम यांनी यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना केला.
तसेच, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, तर मी निश्चितच जाईल. पण निमंत्रण मिळाले नाही, तर मी २२ जानेवारीनंतर जाऊन रामाचे दर्शन घेईल, असे ते म्हणाले.