पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता नसून उलट येत्या काही दिवसांत उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होऊ शकते. विदर्भातील काही जिल्हे उन्हाने तापण्यास सुरूवात झाली आहे.
चंद्रपुरात सर्वाधिक 39.04 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे, तर अकोल्यात 39 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. जळगावातही 38.7 डिग्री सेल्सियस तापमान होते. तसेच येत्या काही दिवसांत उन्हाळा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने येत्या 3 महिन्यांत भयंकर उष्णता वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. यानुसार मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे.
दरम्यान, हवामान विभागाने येत्या चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवलेला असून, दुसऱ्या आठवड्यात विजेच्या कडकडाटासह राज्यात हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतातील अनेक राज्यांत येत्या दोन-तीन दिवसांत हलक्या सरींचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.