मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज आणखी तीन जणांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून या ते काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यातील जनतेने टक्के प्रतिसाद द्यावा असं राजेश टोपे यांनी म्हटले.
ते म्हणाले की, “पंतप्रधानांचे भाषण ऐकले. त्यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. हा योग्य निर्णय आहे. लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्फ्यू पाळायला हवा. तसेच गर्दी कमी व्हावी म्हणून यासाठी आम्ही दुपारी साडे बारा वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधणार आहे. तेव्हा महत्त्वाचे निर्णय जाहीर करणार आहोत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.