वडूज – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तर हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख केला. तर अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी उल्लेख केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता हा राजकारणातील किती दांभिकपणा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तर सत्तेसाठी मोदी कोणत्या थराला जाऊ शकतात हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या योध्दा प्रशिक्षण शिबिरासाठी पृथ्वीराज चव्हाण येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव राजेंद्र शेलार, खटाव- माण तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. अजित पवार यांनी भाजपबरोबर सत्तेत जाण्याच्या भूमिकेबद्दल चव्हाण म्हणाले, “”राज्याच्या राजकारणात चुकीची घटना घडली. ज्यांचे हात बरबटलेले होते त्यांना चौकशीची भीती दाखविली गेली.उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांकडे निलंबनाची तक्रार दिली आहे.
त्यावर न्यायिक कारवाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 53 पैकी दोन तृतीयांश म्हणजे 36 आमदार उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे असतील तर पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटतील. अन्यथा निलंबित होतील अशी कायद्याची परिस्थिती आहे. हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत विषय आहे. आता रस्त्यावरील लढाई सुरू झाली आहे त्याचे रणसिंगदेखील शरद पवार यांनी कऱ्हाडमधून फुंकले आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सतरा पक्षांची आघाडी झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस महत्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विभाजन झाले असले तरी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीतील एक घटक पक्ष राहणार आहे.”
भाजप, शिंदे गट व अजित पवार यांच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारबद्दल चव्हाण म्हणाले, “”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांना समर्थन देणाऱ्या 15 आमदारांच्या निलंबनाबाबत विधीमंडळ अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे. समजलेल्या माहितीप्रमाणे 18 ऑगस्टच्या आत म्हणजे सुप्रिम कोर्टाने ही सर्व बाब अध्यक्षांकडे सोपविल्यानंतर 90 दिवसांच्या आत त्यांना अंतिम निर्णय द्यावा लागेल. आणि तो निर्णय शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना निलंबित करण्याशिवाय दुसरा काही होऊ शकत नाही.
कायद्याची परिस्थिती स्पष्ट आहे. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर झाल्याने त्यांचे निलंबन अटळ आहे. त्यामुळे शिंदे सुध्दा निलंबित होतील. त्यावेळी मुख्यमंत्रीपद रिक्त होईल. चर्चा अशी ऐकू येते की, अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करणे आरएसएस, भाजपच्या नेत्यांना मान्य आहे की नाही ते आपणाला माहिती नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे विरोधाभास असणारे तीन चाकांचे हे सरकार आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी सत्ता टिकविण्याशिवाय लोकांचे भलेबुरे, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मणीपूरमधील हिंसाचार या बाबी दिसत नाहीत. महिला कुस्तीपटूंवर भाजपच्या एका खासदाराने अत्याचार केला तरी मोदी त्यांच्याबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. सत्तेचा वापर प्रचंड संपत्तीसाठी केला जात आहे. मोठमोठी कंत्राटे अदानीला मिळतात, अदानी हा दहा वीस टक्क्यांचा मॅनेजर असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे, असे श्री. चव्हाम यांनी स्पष्ट केले.