मुंबई – यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी अधिवेशन ठरले. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरुन वाद-विवाद झालेले पहायला मिळाले. यातच एका मुद्द्याने सगळ्याचेच लक्ष वेधले. ते म्हणजे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती.
यावरुन विरोधी पक्षाने सरकारला सातत्याने सरकारला लक्ष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या ठीक नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास असल्याने ते सध्या घरुनच सगळे कामकाज पाहत आहेत. मात्र यावरुन विरोधी पक्षांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री सध्या आपल्या खुर्चीवर नाही. ते सध्या आपल्या खुर्चीवर नसतानाही राज्य चांगले सुरु आहे. राज्य सुरळीत चालण्याचे श्रेय पूर्णपणे राज्यातील जनतेला आहे. राज्यातील जनता संयमी आहे, त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि सरकावर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार होते. उद्धव ठाकरेंच्या मणक्याचा आणि मानेच्या स्नायूचा त्रास वाढल्याने त्यांना अधिवेशनाला येणे शक्य नसल्याने ते उपस्थित नाही राहिले.