नवी दिल्ली – गुजरात सरकारने करोना बळींचा आकडा लपवल्याची माहिती उघड झाल्यानंतर कॉंग्रेसने गुजरात सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि शक्तिसिंह गोहिल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
गुजरातमध्ये 1 मार्च ते 10 मे पर्यंत 1, 23, 000 मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली. तर गेल्या वर्षी याच काळात 58 हजार मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामुळे राज्यात तब्बल 65 हजार मृत्यू वाढल्याचे दिसून आले असून हे धक्कादायक आहे.
अचानक राज्यात मृत्यूचा आकडा वाढू शकत नाही. करोना किंवा इतर आजारांमुळेच हा मृत्यूचा आकडा वाढला असेल. किंवा इतर कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मृत्यूची संख्या वाढली असेल. आम्ही या 71 दिवसांच्या आकड्यांचीही खातरजमा केली. त्यानुसार गुजराती वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी आणि आमचे आकडे जवळपास बरोबर असल्याचं आढळून आल्याचे या कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले.
मृतांची संख्या अचानक वाढली आहे. नैसर्गिक मृत्यूमुळे ही संख्या वाढलेली नाही. महामारी किंवा कोणत्या तरी नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा वाढला असावा. मात्र, कोविडमुळेच मृत्यूंची संख्या वाढली असावी अशी आम्हाला शंका आहे. मात्र, राज्य सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याची आम्हाला शंका आहे, असे चिदंबरम म्हणाले.
गंगा नदीत सुमारे दोन हजार अज्ञात मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह नदी किनारी रेतीत गाडलेले होते. त्यामुळे आमची शंका अधिकच बळावली आहे. केंद्र सरकार काही राज्यांशी हात मिळवणी करून नव्या संक्रमणामुळे होणारे मृत्यूचे आकडे लपविण्याचे काम करत आहे.
आमची शंका खरी असेल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच हा गंभीर गुन्हाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. त्यांनी या प्रकरणावर खुलासा करावा अशी आम्ही मागणी करत आहोत, असे कॉंग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.
तसेच व्हॅक्सिनबाबत सरकारमध्ये दुमत आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी करोना लसीचा दुसरा डोस किती दिवसाने घ्यावा याची माहिती द्यावी. दोन लसींमध्ये किती दिवसांचे अंतर असावे याचं सत्य सांगावं. सरकार तज्ज्ञांना दोष देण्याचे काम करत आहे. तसेच व्हॅक्सिनच्या नावाने सरकार ठकवणूक करत आहे, असा दावाही त्यांनी केला.