मुंबई : फेब्रुवारी महिना आणखी पूर्णपणे संपला देखील नाही. त्यातच आतापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुंबईतील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाल्याचे जाणवत आहे. मुंबईत कालच्या तुलनेत 7.6 अंशांनी तापमानात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असून कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे.
उद्यादेखील दोन्ही भागातील किमान तापमान कमीच राहणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.