मुंबई – खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या ‘स्वराज्य संघटने’वर भाष्य केलं आहे. सध्या उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या राजकीय चळवळीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी आपल्या जन्म दिवसानिमित्त मोठी राजकीय घोषणा केली आहे. ‘आता चळवळीत काम करून थकलो आहे. त्यामुळे आता बस्स झालं म्हणत स्वराज्य संघटना शंभर टक्के राजकारणात येणार’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत देखील यावेळी त्यांनी दिले.
यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, “संभाजीराजे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. प्रत्येकाने महत्वाकांक्षी असणं काही चुकीचं नाही. संभाजीराजे यांनी काही दूरदृष्टि ठेऊन निर्णय घेतला असेल. त्यांनी काय नियोजन केलं त्याबाबत कल्पना नाही. समाजाच्या हिताचे असेल तर आमचं सहकार्य राहील.
ते काही परके नाही, भावापेक्षा मी त्यांना मित्र म्हणून मानतो. त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. त्यात कोण आहे माहिती नाही. आम्ही वेगळे नव्हतो, माझं कुणाशीही भांडण नाही.’ असं उदयराजे यावेळी म्हणाले. एकूणच काय तर खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शविला असल्याचं यातून स्पष्ट झाले आहे.
नेमकं संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले वाचा…
काही महिन्यांपूर्वी संभाजी राजेंनी राज्यसभेसाठी सर्व पक्षियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांच्या या आवाहनाचा तितका फायदा त्यांना झाला नव्हता. तेव्हापासून संभाजी राजे आगामी राजकारणाबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
संभाजीराजेंनी राजकीय महत्वकांक्षा स्पष्ट करत राज्यभर दौरा देखील केला. यानंतर ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे स्वराज्य’ अशी संकल्पना राबवली. याच प्रतिसादामुळे स्वराज्य संघटना राजकीय पक्षात यावी अशी मागणी होत होती. त्याच अनुषंगाने आता चळवळीचं काम खूप झालं, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत यावंच लागेल असं म्हणत स्वराज्य संघटना 101 टक्के राजकारणात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.