मुंबई -कॉंग्रेसचा आत्मा हा तसा हिंदूच आहे. त्या पक्षाचेही प्रभू श्रीरामाशी नाते आहे, अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
तसेच, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे विशेष निमंत्रण असल्यास राजकीय मतभेद बाजूला ठेऊन अयोध्येत दाखल व्हावे, असे आवाहनही कॉंग्रेस नेत्यांना केले आहे.
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून सध्या राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
तसेच, कॉंग्रेसचे जोरदार समर्थन केले आहे. अयोध्येत राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बनले. अयोध्येच्या लढ्यात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि त्यांचे सहकारी होते.
भाजपमधील आजचे नेते त्यात होते का हा शोधाचा विषय आहे, असे उपहासात्मक भाष्य त्यात करण्यात आले आहे. राम मंदिर उभारणीस कॉंग्रेसने विरोध केला असे कधीच घडले नाही. राम मंदिर झालेच पाहिजे, असे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मत होते.
त्यांनी बाबरी मशिदीचे दरवाजे उघडून रामाच्या गर्भगृहात पूजाअर्चा सुरू केली. पंतप्रधानपदी पी.व्ही.नरसिंह राव असताना बाबरी मशीद जमीनदोस्त झाली, याकडे अग्रलेखातून लक्ष वेधण्यात आले.
कॉंग्रेसच्या राजवटीत मुस्लिमांना हक्क मिळणार नाहीत म्हणून बॅ.जीना यांनी पाकिस्तान निर्माण केले. महात्मा गांधी यांच्या मुखी तर रामनाम होतेच. गांधीजींनीही रामराज्याची संकल्पना मांडली होती, असे अनेक दाखले ठाकरे गटाकडून देण्यात आले.
राम मंदिर उद्घाटन हा बिगरराजकीय स्वरूपाचा धार्मिक, सांस्कृतिक सोहळा झाला असता तर उचित ठरले असते, अशी भावनाही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.