मुंबई – महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची मंत्रिमंडळातील मंत्रिपदांची नावे निश्चित झाली असून आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष नाराज झाल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हंटले कि, मित्रपक्षातील कोणत्याही नेत्याला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे या सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार नाही. आगामी काळात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित करू, असे त्यांनी सांगितले.
तर शेकापचे नेते जयंत पाटील यांनीही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. ते म्हणाले कि, मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद तर नाहीच, पण या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात ने आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.