नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन भाजप सोबत मिळून राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले आहेत. शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्याने अनेक शिवसैनिक त्यांच्यावर नाराज झाले होते.
अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता तेच कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. शिंदे 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते तेव्हा नाशिक येथे त्यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर काळे फासले होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता नाशिकसह राज्याच्या राजकारणात उलटसूलट चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या बालेकिल्ल्यावर पहिल्यापासून लक्ष आहे. पण एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून वेगळे झाले आणि या गडाला तडे जायला सुरुवात झाली. ठाकरे गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
दरम्यान, याला रोखण्यासाठी जबाबदारी ठाकरेंनी आपले विश्वासू संजय राऊत यांना दिली. त्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये राऊत आले. आणि मुंबईला परतत नाही, तोवर 12 माझी नगरसेवकांनी थेट नागपूर गाठत शिंदेंना जाऊन मिळाले. आता राऊत पुन्हा नाशिकमध्ये आले आहेत. ते येण्याआधीच आणखीन 40 जण शिंदेंना जाऊन मिळाले. शिवसेना नेते संजय राऊत हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून डॅमेज कंट्रोल सुधारण्याचा प्रयत्न करणार आहेत.
संजय राऊत यांनी यावेळी नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. प्रामाणिक शिवसैनिक हे ठाकरे गटासोबत कायम आहेत. जे डुपलिकेट आहेत ते शिंदे गटात जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच जुन्या घटनांचे दाखले देत शिवसेना पक्ष कसा पहिल्यापासून मजबूत राहिला आहे आणि पुढे आणखी मजबूत होईल हे स्पष्ट केले.