मुंबई – लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतलेला असून भाजप विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्यांना बरोबर घेण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, देशात 2014 पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. देशातील सर्व स्वायत्त संस्थांमध्ये मोदी सरकारचा हस्तक्षेप वाढलेला आहे. न्याय व्यवस्थाही यातून सुटलेली नाही, निवडणूक आयोगाची स्थिती आपण पाहतच आहोत, प्रशासकीय व्यवस्थेतही प्रचंड हस्तक्षेप केला जात आहे.
देशातील सध्याची राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे, म्हणूनच लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी, संविधान वाचले पाहिजे. यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला असून रायपूरमध्ये नुकत्याच झालेल्या महाधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व खा. राहुल गांधी यांनी यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडलेली आहे, असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले पुढे म्हणाले की, भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जे राजकीय पक्ष बरोबर येतील, त्यांना सोबत घेण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. भाजप शेतकरी विरोधी आहे, हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. मोदी सरकार असो वा राज्यातील भाजपप्रणित शिंदे सरकार असो ही सरकारे शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत. कांद्याला भाव नाही, धानाला भाव नाही, कापूस, सोयाबिनची अवस्थाही तीच आहे. शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्यामुळे कापसाला कीड लागते व त्यातून शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत.
परवडणारे वैद्यकीय उपचार उपलब्ध करणे ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता – पंतप्रधान मोदी
शेतमालाला भाव मिळू नये व केवळ मुठभर उद्योगपतींना फायदा व्हावा, यासाठी भाजप सरकार काम करत आहे. शहरांची नावं बदलून शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा फायदा होत असेल, महागाई कमी होत असेल, लोकांचे प्रश्न सुटत असतील तर जरूर बदला पण भाजप सरकार मानवी गरजांकडे दुर्लक्ष करुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या मुद्द्यांना प्राधान्य देत आहे. यातून जातीय तणाव वाढत आहे, हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करुन सामाजिक एकतेला तडा देण्याचे काम केले जात आहे, असा आरोपदेखील नाना पटोले यांनी केला.