येरवडा – मुळा नदीत रसायनमिश्रीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे संपूर्ण नदीचे पाणी दूषित झाले आहे. कंपन्यांकडून प्रक्रिया न करतानाच रसायनमिश्रीत पाणी नदीत सोडले जात असल्याने दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात सुटत असून पात्रात मोठ्या प्रमाणात हानीकारक फेस तयार होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही स्थिती कायम आहे.
विश्रांतवाडी, कळस, शांतीनगर येथील रहिवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून महापालिका प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याची वारंवार तक्रार करण्यात आल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पाण्यात मिसळणाऱ्या रसायनांमुळे पाण्यावर फेस तयार होत आहे. हा फेस हवेत उडून आजूबाजूच्या इमारतीवरील गच्चीवर जमा होतो. यातून डोळ्यांना त्रास होत असून हा फेस अंगावर पडल्यास त्वचेला खाज सुटत आहे. यातून मच्छर, किटकांचाही त्रास वाढला असल्याने अन आजारही बळावले आहेत. तसेच, यातून नदीतील मासे तसेच अन्य जलचर प्राणी नष्ट होत आहेत.
रसायनमिश्रीत पाणी, आजूबाजूच्या रहिवासी भागातील ड्रेनेजचे पाणी, कचरा, प्लॅस्टिक यामुळे नदीचे गटार झाले आहे. नदीपात्राची गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता झालेली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. कळस येथे बांधलेला बंधाराही तुटलेला आहे. हा बंधारा दुरुस्त करण्याचीही मागणी नागरिकांकडून होत आहे.