गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा नाही : जारमधून अशुद्ध पाणी, पाणीकपातीमुळे विक्री जोरात
पिंपरी – शहरावर महापालिकेच्या वतीने एक दिवसाआड पाणीकपात लादण्यात आली आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र “अच्छे दिन’ आल्याचे पहायला मिळत आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणीविक्रीचा गोरखधंदा शहरामध्ये जोरात सुरू आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने शहराच्या गल्ली बोळांमध्ये थंड पाण्याच्या जारची दुकाने थाटली आहेत.
कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून पाणी विक्रीच्या व्यवसायाकडे पाहिले जाते. सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच होते. नंतर या व्यवसायाने विशाल रुप धारण केले व त्यातील शुद्धता हरवली. आता भूगर्भातील पाणी उपसून थंड करून विकण्यास कमी खर्च लागत आहे. त्यामुळे गल्ली बोळामध्ये असे व्यवसाय सुरु झाले आहे. मात्र यामध्ये पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तसेच त्यावर कोणतीही माहिती देण्यात येत नाही.
महापालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा तसेच बोअरवेलमधून उपसा करून ते पाणी थंड केले जाते. हे पाणी 20 लिटरच्या जारमध्ये भरुन 50 ते 70 रुपये दराने विक्री केली जात आहे. विविध सण, समारंभ, लग्न, पार्ट्या यासाठी नागरिक जारची मागणी करतात. काही उपनगरांमध्ये आयटीयन्सची आणि इतर प्रोफेशनल्सची संख्या अधिक आहे. पाणी येण्याच्या वेळेस ते कामावर असल्याने किंवा नाइट शिफ्ट करुन आल्यामुळे झोपलेले असल्याने त्यांना विकतच्या पाण्याचाच आधार आहे. तसेच अनेक नागरिक शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे, म्हणून घरामध्येही या जारची मागणी करतात.
शासकीय कार्यालये, दुकाने यामध्येही जारच्या पाण्याला मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत. गल्लीबोळातील दुकानदार आणि स्वीट मार्टवाले आता जोरदार पाणी विक्री करत आहेत. मात्र गल्लोगल्लीच्या या दुकानांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सावध होऊन या अशुद्ध पाणी विक्रीला आळा घालायला हवा. पाणीविक्री करणारे व्यावसायिक नियमांमधून पळवाट काढत आहेत. पाण्याच्या जारवर शुद्धतेचे प्रमाण दर्शविणारी कोणतीही माहिती देण्यात येत नाही. केवळ कंपनीच्या नावाचे लेबल लावून हा गोरखधंदा सुरु आहे.
गल्लीबोळात अन् घरातच थाटले व्यवसाय
कोणताही व्यवसाय सुरु करण्याकरिता महापालिका प्रशासन व ग्रामीण भागामध्ये प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. मात्र पाण्याचे जार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना कुठलीही नियमावली नसल्याने पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे फावले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता घरीच एखाद्या खोलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये पाण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे.
गुणवत्ता तपासणीसाठी यंत्रणेचा अभाव
कडक उन्हाळा सुरु झाल्यावर नागरिकांकडून थंड पाण्याची मागणी वाढते. या पाण्याची चार पाच दिवसांनी आपोआप चव बदलते. त्यावरुन त्या पाण्याची गुणवत्ता लक्षात येते. पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात जारवर कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी ग्राहकांवरच आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा हे जार विक्री करणारे व्यावसायिक करतात का याची तपासणी ग्राहकांनीच करायची आहे. अन्यथा हे हवेहवेसे वाटणारे थंड पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
तीन-चार दिवसांनी पाण्याची चव बदलते
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर थंड पाणीविक्रीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे-गुरव, मोशी, चऱ्होली, काळेवाडी तसेच हिंजवडी या भागात मोठ्या प्रमाणावर जारच्या पाणीविक्रीचा व्यवसाय थाटण्यात आले आहेत. हा व्यवसाय करत असताना खबरदारीचा कोणत्याही उपाययोजना व्यावसायिकांनी केलेली नाही. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याच्या या व्यवसायाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.