रवींद्र चौधर ः एक गाव एक शिवजयंती संकल्पना चांगली
आळंदी – श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आळंदीतील सर्व युवकांनी एकत्र येऊन “एक गाव एक शिवजयंती’ ही संकल्पना या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक आदर्श आणि प्रेरणादायी निर्णय असून याचा सर्वांना आदर्श घ्यावा, तसेच आळंदीत शिवजयंतीचा उत्सव शांततेत पार पाडूया, असे आवाहन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी केले. या संदर्भात आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आनंदराव मुंगसे, आळंदी पोलीस स्टेशनचे मच्छिंद्र शेंडगे, अजित वडगावकर, डॉ. नीलेश रंधवे, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले, सतीश कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर रानवडे, अनिकेत डफळ, वैभव वरखडे, धनंजय घुंडरे, अजय घुंडरे, तेजस कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, आळंदी शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि युवक उपस्थित होते.
चौधर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूकही वेळेत सुरू करावी आणि वेळेत कशी संपवता येईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच कसल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शिस्तबद्ध वातावरणात शिवजयंती मिरवणूक झाली पाहिजे. मिरवणुकीत डीजे व पाश्चात्त्य पद्धतीच्या वाद्यांचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे.
यावेळी डी. डी. भोसले म्हणाले की, मिरवणुकीच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे खासगी वाहनांना प्रवेश देऊ नये जेणेकरून मिरवणूक सुरळीत पार पाडली जाईल व याचा सर्वांना आनंद घेता येईल. यावेळी आळंदी नगरपरिषदकडून अग्निशमन दलाच्या गाडीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच रुग्णवाहिका सोयसुद्धा करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी युवकांना नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.