नवी दिल्ली: राष्ट्रीय हरित लवादाला स्वतःहून कारवाई करण्याचा अधिकार आहे, पर्यावरणाच्या हानीच्या घटनांच्या संबंधात आम्ही हातावर हात धरून बसणार नाही, असा इशारा या लवादाने दिला आहे.
विशाखापट्टणमला एल. जी. पॉलिमर्स कंपनीत वायुगळती होऊन त्यात 11 जण मृत्युमुखी पडले आणि त्याचा एक हजार लोकांना फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे. अशा घटनांमधील आपद्ग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे नमूद करीत या लवादाने या वायुगळतीतील लोकांना मदत करण्याचीही ग्वाही दिली आहे.
अशा दुर्घटनांचा फटका गरिबांनाच अधिक बसतो व हे शोषित समाजाचे लोक स्वतःहून पुढे येऊ शकत नाहीत. राष्ट्रीय हरित लवादापर्यंत पोहोचण्याचाही त्यांचा आवाका नसतो म्हणून आम्ही गप्प बसणार नाही, अशा प्रकरणात स्वतःहून निर्णय घेण्याचाही अधिकार हरित लवादाला आहे, असेही या लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्शकुमार गोयल यांनी म्हटले आहे. आम्हीच आमचे अधिकार वापरले नाही तर या आपद्ग्रस्तांना कोणी वाली राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकांनी मदतीसाठी अर्ज केला तरच त्यांचा विचार करायचा ही पद्धत अशा प्रकारच्या घटनांमध्ये अवलंबता येणार नाही असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या कायदेशीर हक्कासाठीच हरित लवादाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या संबंधित खटले न्यायालयांमार्फत निकाली काढण्याच प्रक्रियाही ही केवळ तांत्रिक स्वरूपाची आहे. पर्यावरणाशी संबंधित विषय अशा केवळ तांत्रिक स्वरूपात हाताळता येणार नाहीत, असेही या लवादाने म्हटले आहे.